राजीव गांधी हत्या प्रकरण ः सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरनची मुदतपूर्व मुक्तता करण्याची मागणी करणाऱया याचिकेवर सुनावणी करत सोमवारी केंद्र तसेच तामिळनाडू सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायाधीश बी.आर. गवई आणि बी.व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने केंद्र तसेच तामिळनाडू सरकारला भूमिका मांडण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणातील दोषी आर.पी. रविचंद्रनच्या याचिकेवरही नोटीस बजावली आहे. तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान 21 मे 1991 रोजी एका महिला आत्मघाती दहशतवाद्याकडून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटाप्रकरणी नलिनीला मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. 2001 मध्ये तिची ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती.