प्रेषितांसंबंधी विधान प्रकरणी आता राजकारण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात कथित विधान केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमक्या देण्यात आल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण पुरविले आहे. 12 दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेस भाग घेत असताना त्यांनी हे विधान केले होते. ते वादग्रस्त आहे, असा मुस्लीम संघटनांनी आरोप केला होता. मध्यपूर्वेतील अनेक मुस्लीम देशांनीही या विधानाचा निषेध केला होता. भाजपने शर्मा यांना 6 वर्षांसाठी निलंबित केल्यानंतरही या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत.
शर्मा यांच्यासह भाजपच्या दिल्ली शाखेचे मिडिया प्रमुख जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला असून शर्मा यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. भाजपने विरोधी पक्षांचा निषेध केला आहे.
भारताच्या राजदूतांना पाचारण
शर्मा यांनी हे कथित विधान केल्यानंतर 10 दिवसांनी कुवेत, कतार आणि इराण इत्यादी मुस्लीम देशांनी भारतीय राजदूतांना पाचारण करुन नाराजी व्यक्त केली होती. इंडोनेशिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, बाहरीन, मालदिव, ओमान आणि अफगाणिस्तान यांनीही या विधानाचा निषेध केला होता. शर्मा आणि जिंदाल यांच्याविरोधातील कारवाईचे काही देशांनी स्वागत केले होते.
शर्मा यांना धमक्या
संबंधित विधानासंदर्भात क्षमायाचना करा, अन्यथा परिणाम गंभीर होईल अशा धमक्या काही मुस्लीम संघटनांकडून शर्मा यांना देण्यात येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना शस्त्रधारी पोलिसांचे सुरक्षा कवच पुरविले आहे. शर्मा यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार सादर केल्यानंतर त्यांना सुरक्ष पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
इस्लामी देश संघटनेचा तीव्र निषेध
या मुद्दय़ावर 57 मुस्लीम देशांच्या संघटनेने भारताविरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध भारताने केला आहे. भारत सर्व धर्मांचा अत्यादर करतो. भारतात सर्व धर्मांच्या लोकांना सन्मानाची वागणूक मिळते. त्यामुळे या संघटनेने केलेले वक्तव्य खोडसाळ असून ते दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आणि हेतुपुरस्सर करण्यात आलेले आहे, असा प्रहार भारताच्या विदेश व्यवहार विभागाने केला आहे.
विश्व हिंदू परिषद-मुस्लीम संघटना वाग्युद्ध
कोणत्याही धर्माच्या देवतेवतांचा किंवा महनीय व्यक्तींचा अवमान केला जाता कामा नये. केवळ हा नियम हिंदू प्रवक्त्यांसाठी नसून सर्वच धर्मांच्या प्रवक्त्यांसाठी असावा. हिंदूंच्याही देवदेवनांचा अवमान केला जातो. ज्ञानवापी परिसरात मिळालेल्या शिवलिंगाचा अवमान मुस्लीमांकडून कारंजा या शब्दात केला जातो. हा हिंदू धर्माचा अवमानच असून तोही होता कामा नये, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळाने शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ट्विटर आणि इतर सोशल मिडियावरुनही या मुद्दय़ावर असंख्य प्रतिक्रिया येत असून बहुसंख्य व्यक्तींनी मुस्लीमांच्या भूमिकेवर टीका केली असल्याचे दिसून येत आहे. कतार देशाने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताने कतार एअरवेजवर बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.