चुये / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीचे इतर मागास प्रवर्ग महिला व पुरुष व सर्वसाधारण महिला यांची आरक्षण सोडत २९ जुलै रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश करवीरच्या तहसीलदार शितल मुळे भामरे यांनी काल(ता.24) सर्व ग्रामपंचायतींना दिला.इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र काही दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ या प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्याचा आदेश दिला.त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे यांनी तालुक्यातील 28 प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
२९ जुलै रोजी विशेष ग्रामसभा होणार
इतर मागास प्रवर्गातील व सर्वसाधारण महिला प्रवर्ग यांचे आरक्षण सोडत काढण्यासाठी २९ जुलै रोजी संबंधित ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा बोलावून त्या ठिकाणी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.प्राधिकृत अधिकारी आणि ग्रामसेवक तलाठी यांच्या उपस्थितीत ही सोडत निघणार आहे.ही सोडत प्रक्रिया कशी पार पाडायची याबाबतचे प्रशिक्षण 26 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता करवीर पंचायत समितीच्या राजश्री शाहू सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे.या ठिकाणी तहसीलदार शितल मुळे भामरे हे या मार्गदर्शन करणार आहेत.
राजकीय हालचाली गतिमान होणार
मिनी मंत्रालय म्हणून ज्या घटकाचा उल्लेख केला जातो त्या ग्रामपंचायतीचेओबीसी आरक्षण व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत कधी निघणार याची उत्सुकता करवीर तालुक्यात होती. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्या गावातील राजकीय हालचाली अद्याप सुरू नाहीत.मात्र आरक्षणाचा मूहूर्त निश्चित झाल्यामुळे या घडामोडींना वेग येणार आहे. 29 जुलै रोजी आरक्षण सोडत घोषित झाल्यानंतर स्थानिक राजकीय गटातटांच्या चर्चेना व राजकीय जोडण्यांना सुरवात होणार आहे.