शेतकऱ्यांनी भूमीहीन न होण्याचा केला निर्धार : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे मांडल्या तक्रारी
बेळगाव : रिंगरोडमुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे तालुका म. ए. समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोमवारी झाडशहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. रिंगरोडमध्ये हजारो एकर जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. रिंगरोडसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना रक्कम द्यावी लागणार, याचबरोबर रस्ता करण्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे. आमचे जीवनच या अल्पभूमीवर अवलंबून आहे. तीच जमीन आमच्याकडून काढून घेतला तर आम्ही जगायचे कसे? वडिलोपार्जित आम्हाला जमीन मिळाल्या. आता आमचे संपूर्ण कुटुंब या जमिनीवरच अवलंबून आहे. आमच्या माघारी आमची मुले, नातवंडे यांना जमीन नको का? असा भावनिक प्रश्न उपस्थित करत झाडशहापूरच्या शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. रिंगरोडसाठी तालुक्यातील 32 गावांमधील सुपिक जमिनी हिसकावून घेतल्या जात आहे. विविध प्रकल्पांसाठी तालुक्यातील हजारो एकर जमीन घेण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा रिंगरोडसाठी तब्बल 1200 हून अधिक एकर जमीन घेण्याचा घाट घालण्यात आला. त्यामुळे आम्ही पूर्णपणे भूमीहीन होणार आहोत. यातच वाढते काँक्रीटचे जंगल, विविध गावांचा होत असलेला विस्तार त्यामुळे शेतीच शिल्लक राहणार नाही. पैसे घेऊन करायचे तरी काय? तेव्हा कृपा करून आमच्या पोटावर लाथ मारू नका, असे म्हणणे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे मांडले.
नियोजित करण्यात आलेला रिंगरोड रद्द करा
एक तर आम्हाला नोकरी नाही. आम्ही मराठी भाषिक आहोत, त्यामुळे नोकरी मिळत नाही. नोकरी नाही त्यामुळे मुलांना विवाहासाठी मुलीही दिल्या जात नाहीत. आता थोडी जमीन शिल्लक आहे. त्यावर उदरनिर्वाह करत आहे. तीच जर जमीन काढून घेतला तर आम्ही जायचे कोठे? तेव्हा याचा सारासार विचार करा आणि नियोजित करण्यात आलेला रिंगरोड रद्द करा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांचे वकील शाम पाटील, कल्लाप्पा परशराम गोरल, भरमाण्णा चन्नाप्पा नंदिहळ्ळी, परशराम रामा नंदिहळ्ळी, परशराम चन्नाप्पा गोरल, नारायण ओमाना येळ्ळूरकर, आप्पाजी ओमाना येळळूरकर, मधु ईराप्पा नंदिहळ्ळी, परशराम खोबाना नंदिहळ्ळी, चन्नाप्पा खोबाना नंदिहळ्ळी, रामा मल्लाप्पा नंदिहळ्ळी, बाळू टोप्पान्ना नंदिहळ्ळी, नागेश नंदिहळ्ळी, रामा नंदिहळ्ळी, भरमाना नंदिहळ्ळी, नारायण गोरल, भरमान्ना गोरल, उत्तम गोरल, हणमंत बेळगावकर, परशराम नागेंद्र नंदिहळ्ळी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.