हल्लेखोर ‘एएसआय’ला अटक ः गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नाबा किशोर दास यांच्यावर रविवारी एका पोलीस अधिकाऱयाने गोळीबार करत त्यांची हत्या केली. रविवारी दुपारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या हत्येप्रकरणी गोळीबार करणाऱया संबंधित पोलीस अधिकाऱयाला अटक करण्यात आली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. या गोळीबार-हत्येमागील कारण तपास यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
एका सार्वजनिक सभेला जात असताना आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांच्यावर गोळीबार झाल्याने खळबळ निर्माण झाली. कार्यक्रमस्थळी सुरक्षेवर तैनात असलेल्या एएसआय गोपाल दास यांनी सुमारे चार ते पाच राऊंड गोळीबार केला. त्यापैकी दोन गोळय़ा आरोग्यमंत्र्यांच्या छातीत घुसल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने वैद्यकीय अधिकारी त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली.
गोळीबाराची मुख्य घटना घटना ब्रजराजनगर येथील गांधी चौकात दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने (एएसआय) गोळीबार केला. सुरुवातीला नबा दास यांच्या छातीत 4-5 गोळय़ा लागल्याचे वृत्त होते, पण नंतर पोलिसांनी दोन गोळय़ा लागल्याची पुष्टी केली. सुरुवातीला त्यांच्यावर ब्रजराजनगर येथे उपचार करण्यात आले. मात्र, अधिक उपचारार्थ विमानाने भुवनेश्वरला एअरलिफ्ट करून नेण्यात आले. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नबा दास यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दास यांना भेटण्यासाठी ते तातडीने भुवनेश्वरमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. तसेच या सर्व घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
गोळीबार करणारा एएसआय जेरबंद
दुसरीकडे, गोळीबार करणाऱया एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप आरोपीने हल्ल्याचे कारण सांगितलेले नाही. नबा दास कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ब्रजराजनगरला पोहोचले होते. गाडीतून खाली उतरताच एका एएसआय गोपालदासने नबा दास यांच्यावर चार ते पाच राऊंड गोळीबार केला, असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले. प्रत्यक्षदर्शींनीही पोलीस अधिकाऱयानेच गोळीबार केला असल्याचे स्पष्ट केले आहे. गोळीबार केल्यानंतर एक पोलीस पळून जात असल्याचे आम्ही पाहिले, असे प्रत्यक्षदर्शी वकील राम मोहन राव यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना शोक अनावर
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. तसेच गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱयांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले असून या घटनेचा योग्यपणे तपास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
झारसुगुडा मतदारसंघातून सलग तिसऱयांदा आमदार
नाबा किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशातील झारसुगुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. 2014 मध्येही काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते बिजू जनता दलाशी लढत सलग तिसऱयांदा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले. नाबा किशोर दास हे या भागातील प्रभावशाली नेते मानले जातात. दास हे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमधून बिजू जनता दलात (बीजेडी) प्रवेश केल्यावर पटनायक यांनी त्यांच्यावर आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक
नाबा किशोर हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45.12 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांकडे सुमारे 15 कोटी किमतीची 70 वाहने असून त्यात 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ समाविष्ट आहे. दास अलीकडेच मोठय़ा प्रमाणात देणगी दिल्याने प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता.
तीन शस्त्र परवाने
नब किशोर दास यांच्याकडे 55,000 रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर, 1.25 लाख रुपये किमतीची रायफल आणि 17,500 रुपये किमतीची डबल बॅरल बंदूक यासह तीन शस्त्रे आहेत. नाबा किशोर दास यांच्या पत्नीकडे 34 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने विविध बँकांमध्ये पैसे जमा आहेत.
शहरात तणाव, सुरक्षेतील त्रुटी उघड
दास यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. मंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दास यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचा आरोप काही समर्थकांनी केला. आरोपी एएसआयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत.