आमदार निखील कत्ती यांची माहिती : हुक्केरी येथे अधिकाऱ्यांची बैठक
वार्ताहर / हुक्केरी
पुढील महिन्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होतो, तेथे अधिकाऱ्यांनी सतर्क राहून सेवा बजावावी. नुकसान टाळण्यासाठी 24 तास लक्ष ठेवून नागरिकांना सेवा द्या, अशी सूचना आमदार निखील कत्ती यांनी केली. येथील तालुका पंचायत सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कत्ती पुढे म्हणाले, तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, तसेच अतिवृष्टीकाळात कोणाचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन करावे. त्या नियोजनाचा आढावा घेऊन योग्यरित्या कार्यरत रहावे. दिवंगत उमेश कत्ती यांना ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी सहकार्य केले तसेच आपणासही करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तहसीलदार संजय इंगळे म्हणाले, अतिवृष्टीचा तालुक्यातील 26 गावांना फटका बसतो. त्यामुळे तेथे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा कसा सामना करायचा, याविषयाचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुरक्षितस्थळांची नोंद करण्यात आली असून तेथे केंद्र प्रमुख अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी अधिकारी महादेव पटगुंदी म्हणाले, आतापर्यंत हुक्केरी तालुक्यातील 30 टक्के, संकेश्वर भागातील 30 टक्के तर यमकनमर्डी भागात 29 टक्के पाऊस कमी झाला आहे. काही दिवसांत वळिवाची जोरदार हजेरी लागल्यास तालुक्यातील बहुतांशी शेतजमीन पेरणी करण्यासाठी तयार होऊ शकते. 66 हजार हेक्टर जमीन पीक उत्पादनासाठी पूरक आहे. त्यापैकी 14 हजार हेक्टर जमिनीत ऊसपीक आहे. 26 हजार 555 हेक्टर जमिनीत सोयाबीन पिकाची पेरणी होणार आहे. तर उर्वरित जमिनीमध्ये कापुस, मका व इतर पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या तालुक्यातील बहुतांशी शेतकरी सोयाबीनचे पीक घेत आहेत. त्या उत्पादनासाठी संकेश्वर व यमकनमर्डी येथील रयत संपर्क केंद्रात बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत 10 हजार क्विंटल बियाणांची मागणी वाढली आहे. सध्या 7 हजार क्विंटल बियाणांचा स्टॉक उपलब्ध आहे. बियाणे वितरणाचा काळाबाजार होणार नाही, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच बियाणांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. पशु खात्याचे अधिकारी डॉ. कदम म्हणाले, तालुक्यात एकूण 1 लाख 24 हजार 640 जनावरे आहेत. मेंढी व बकऱ्यांना पुढील काळात रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण उपलब्ध केले जाणार आहे. महापूरकाळात बेळवी येथे गो-शाळा उघडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या सभेत फलोद्यान, आरोग्य, रेशीम, अंगणवाडी, बांधकाम, पाटबंधारे, जलजीवन मिशन, वीज संघाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सांगितली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांच्यावतीने आमदार निखील कत्ती यांचा सत्कार करण्यात आला.