ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीका करत आहेत. त्याची चर्चा राज्यात सुरु असताना आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शरद पवारांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात जराही तथ्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अदित पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही उल्लेख अजित पवारांनी केला आहे.
“शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही. राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचे नाव घेतले तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये”, असे अजित पवार यांनी म्हटले.