बेळगाव : ऐन गणेशोत्सवात शहापूर परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. किमान सणासुदीच्या काळात तरी वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून शहापूरच्या बऱ्याचशा भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता 3 ते 4 तास वीजपुरवठा नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सरकारने गृहज्योती योजना लागू केली असली तरी यामुळे विजेच्या समस्या मात्र भरमसाट वाढल्या आहेत. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरासह तालुक्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसोबतच लघुउद्योजक व व्यापाऱ्यांनाही बसत आहे. 2 ते 3 तास वीज नसल्यास नाशवंत पदार्थ खराब होत असल्यामुळे हेस्कॉमच्या कारभाराबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यामुळे किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करा, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. रविवारी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महाप्रसादाच्या तयारीसाठी पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. परंतु, वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांची गैरसोय झाली. जोवर लाईट येणार नाही, तोवर काम चालणार नाही, अशी परिस्थिती असल्याने हेस्कॉम कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. केवळ शहापूरच नाही तर शहराच्या इतर भागातही विजेच्या समस्या वाढल्या आहेत. तक्रारी करूनदेखील त्यांना समर्पक उत्तरे दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.
Previous Articleविसर्जन मिरवणूक दुपारीच सुरू करा
Next Article जिल्हाधिकारी कार्यालय नूतन आराखड्याला मंजुरी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment