अध्याय तेविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, जे विवेकसंपन्न व क्षमाशील साधू असतात, ते विषयभोग आले तरी अंगामध्ये परिपूर्ण शांती ठेवून आनंदाने वागत असतात. देहाभिमान बाळगणारे असे जे तामसी, अत्यंत दुष्ट व दुर्जन असतात, त्यांनी साधूंचा छळ केला, तरी त्या साधूंजवळ शांती असल्यामुळे ते कधीही क्रोधाच्या आधीन होत नाहीत. जे ज्ञानसंपन्न असतात, ते अल्पस्वल्प उपद्रवाने रागावत नाहीत किंवा त्यांचा अतिशय छळ केला, तरीही ते कोपायमान होत नाहीत. साधु पुरुष आपल्या शांतवृत्तीतच अढळ असल्यामुळे ते सर्व विवेकाने सहन करतात. होणारा छळ आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे असे समजून ते निमूटपणे भोगतात. लोकही त्यांना निरनिराळय़ा प्रकाराने छळत असतात. साधूंनी सरळ भाषण केले तरी लोक त्यावर आक्षेप घेऊन त्यांचा उपहास करतात, त्यांना झिडकारून त्यांची निर्भत्सना करतात, इतकेच नव्हे, तर भर सभेतही त्यांचा अपमान करतात.
शब्दांनीच शब्दच्छळ करून हा दुष्ट आहे, दुर्जन आहे, दुःशील आहे, अपवित्र आहे, अमंगल आहे असे म्हणतात. अशी दुर्जनांनी कितीही जरी दुष्ट भाषणे केली, तरी साधू आपल्या शांत वृत्तीने ते सर्व सहन करीत असतो. उद्धवा, हे सहन करण्यासाठी आवश्यक ती मनःशांती कशी उत्पन्न होते तेही सांगतो. लोकात मान झाला किंवा अपमान झाला तरी ती केवळ मनाची कल्पनाच होय असा विचार सज्जन करत असतो. इहलोकात लाभ होणे किंवा न होणे हे केवळ दैवाधीन आहे, त्यांना देणारे किंवा नेणारे तेच आहे, असे म्हणून तो कोणाचाच द्वेष करीत नाही आणि शांतीचा गुण सोडत नाही. अशा विचाराने ज्याला शांती प्राप्त होते, त्याच्या चारीही मुक्ति दासी होऊन राहतात. मी प्रत्यक्ष श्रीकृष्णही त्याचा चाकर होतो. यापेक्षा अधिक लाभ तो कोणता? म्हणून सांगतो की, ज्याला केवळ मोक्ष हवा आहे, त्याने तर सर्वस्वेकरून शांती पाळावी. म्हणजे दुःखरूप समुद्राच्या भोवऱयातून तीच सुखरूपतेने तारील. वैराग्य, योग, ज्ञान किंवा ध्यान यातून मिळणारे फळ म्हणजेच शांती होय. ती शांती पूर्णपणे साध्य करून साधू आपला आपणच उद्धार करून घेतात. ह्याकरिता उद्धवा! शीत-उष्ण, सुख-दुख इत्यादि द्वंद्वांतील कठिणपणा आहे तो सहन करून परिपूर्ण शांती साधावी आणि पूर्णब्रह्मस्वरूपाला पोचावे. पूर्णब्रह्माला पोचल्यानंतर जन्ममरणाची गोष्टच खुंटते आणि परमानंदाची मिठी पडली की, त्याचवेळी संसारभय नष्ट होते. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धव अतिशय चकित झाला. तो मनात म्हणाला, कुणीही कितीही उपद्रव दिला, छळ केला तरी तो शांत राहून सहन करणे इतकी पराकोटीची शांती बाळगणे कुणाला तरी शक्मय आहे का? असल्या ह्या शांतीच्या गोष्टी कधी मी ऐकलेल्यासुद्धा नाहीत, मग डोळय़ांनी कशा पाहणार? असा शांत पुरुष या साऱया पृथ्वीतलावरसुद्धा नसेल. असा विचार करून तो भगवंतांना म्हणाला, हे कृष्णा! पूर्वी कधी ऐकली नाही की पाहिली नाही, अशी ही शांती तू काढलीस तरी कोठून? मोक्ष मिळवण्यासाठी इतकी शांती धारण करण्याची आवश्यकता आहे, ही कल्पना ऐकूनच माझी बुद्धी भयाने अगदी गांगरून गेली आहे. अशी शांती ज्याला लाभली आहे, असा मागे कोणी झालेला मी ऐकला नाही व पुढे कोणी होईल असेही वाटत नाही. म्हणून तू जो निग्रह सांगितलास तो आम्हाला साधणे परम दुर्घट आहे. साधुवर ओढवणाऱया परिस्थितीचे जे वर्णन तू केलेस, ते द्वंद्व योग्यालासुद्धा सहन होणे कठीण मग आम्हा सामान्य जनांना कसे सहन होईल? या माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगण्यास तूच कुशल आहेस. हे विश्वात्मन! जे आपल्या चरणांना शरण आलेले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांनासुद्धा स्वभाव बदलता येणे शक्मय नाही. दुर्जनांची कृत्ये मला तर मुळीच सहन होण्यासारखी नाहीत. म्हणून मी आपले सांगणे आचरणात कसे आणू शकेन हे मला समजाऊन सांगा.
क्रमशः