कृषीमंत्री रवी नाईक यांचे उद्गार : क्रांती मैदानावर स्वातंत्र्यदिन उत्साहात
प्रतिनिधी /फोंडा
स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले व विविध जाती धर्मांमधील सलोखा आणि एकतेमुळे ते अखंड राहिले. स्वातंत्र्यामुळेच गेल्या 75 वर्षांत देशाची व राज्याची चौफेर प्रगती झाली असून यापुढेही ते टिकून राहण्यासाठी शांतता व सलोख्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथील स्वातंत्र्यदिन सोहळय़ात बोलताना केले.
येथील क्रांतीमैदानावर मोठय़ा उत्साहात हा सोहळय़ा पार पडला. मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. तिरंगा फडकाविल्यानंतर फोंडा पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. नगराध्यक्ष रितेश नाईक, स्वातंत्र्य सैनिक गोविंद चिमुलकर, रोहिदास नाईक, अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार विमोद दलाल, पोलीस उपअधीक्षक सी. एल. पाटील. अग्नीशामक दलाचे विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर तसेच नगरसेवक व विविध सरकारी खात्यांचे अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमाला मोठय़ासंख्येने उपस्थित हेते.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ाला अहिंसेचा मोठा इतिहास असून या तत्त्वावरच जगात खऱया अर्थाने शांतता नांदणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात शांतता नांदावी यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय परंपरा व संस्कृती नवीन पिढीने जपली पाहिजे. एकतेमुळेच देशाची व राज्याची प्रगती अधिक गतिमान होईल, असेही मंत्री रवी नाईक यांनी पुढे बोलताना नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले. गोवा मुक्तीलढय़ात योगदान दिलेल्या चार स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी मरणोत्तर सन्मान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी हा सन्मान स्वीकारला. त्यानंतर लोकविश्वास प्रतिष्ठान, प्रगती विद्यालय व अन्य शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.