पुणे / प्रतिनिधी :
राज्यभरात लाच प्रकरणात अडकलेले शिक्षक, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहे. शिक्षण आयुक्तांनी थेट एसीबीला पत्र दिल्याने शिक्षण विभागातील लाचखोर आगामी काळात अडचणीत येणार आहेत.
शिक्षण विभागातील शिक्षक, अधिकारी लाच घेताना पकडले गेले. लाच प्रकरणात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, संबंधित अधिकारी किंवा शिक्षक पुन्हा सेवेत रूजू होतो. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र देऊन लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी व्हावी म्हणून पत्र दिले आहे. मांढरे यांनी राज्यातील सर्व परिक्षेत्रातील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पोलीस अधिक्षकांना यापूर्वी पत्र पाठविले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे कार्यालयातील पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यास दुजोरा दिला आहे. शिक्षण आयुक्तांनी आम्हाला शिक्षण विभागातील लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी करावी, असे पत्र दिले आहे. जे शिक्षक, अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. त्यांची उघड चौकशी व्हावी, असे पत्रात म्हटले आहे.
शिक्षण आयुक्तांचे पत्र आम्हाला मिळण्यापूर्वी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी आणि शिक्षकांची उघड चौकशी सुरू केली आहे, असेही पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगण्यात आले.