आजपासून बेंगळूरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. बेंगळूर येथे दहा दिवस हे अधिवेशन होणार असून सरकारचे अपयश समोर ठेवून सत्ताधारी पक्षावर तुटून पडण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत. पीएसआय भरतीघोटाळा, 40 टक्के कमिशनचा आरोप, बेंगळुरातील पाऊस, अतिवृष्टी यासह अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक जुंपणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि निजदने सत्ताधारी भाजप सरकारचे अपयश समोर ठेवून कोंडीत पकडण्याची सर्व तयारी केली आहे. त्यानुसार आपापली वेगवेगळी रणनीती आखली आहे. यामुळे निश्चित हे अधिवेशन गाजणार आहे. बेंगळूरमध्ये पावसामुळे आलेली आपत्ती, अतिवृष्टीमुळे शेतकऱयांवर आलेले संकट आणि अतिवृष्टी व्यवस्थापन करण्यात सरकारला आलेल्या अपयशाचा अस्त्र म्हणून वापर करून विरोधी पक्षाने सरकारला कोडींत पकडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद सभापती निवड आज शक्य
आजपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या नूतन सभापतींची निवड होण्याची शक्मयता आहे. विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापतिपद रिक्त झाले असून रघुनाथ मलकापुरे हे हंगामी सभापती म्हणून काम पाहत आहेत. सभापतिपदाचा राजीनामा दिलेले बसवराज होरट्टी भाजपप्रवेश करत शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने त्यांची पुन्हा सभापतिपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अधिवेशनात नवीन सभापती निवडप्रक्रिया होण्याची शक्मयता आहे.