प्रकल्पावर चर्चा डावलल्याने गदारोळ : सरपंचांचा पुन्हा सभा घेण्याचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
मळकर्णे गावातीलही काही जागा नियोजित आयआयटी संकुलासाठी जात असल्याने त्याबाबत चर्चा करण्याचा आग्रह मळकर्णे ग्रामक्षेत्रातच येत असलेल्या नागवे भागातील काही ग्रामस्थांनी काल रविवारी मळकर्णे ग्रामसभेत धरला. याबाबतचे काही पुरावेही त्यांनी सादर केले. त्यामुळे आयआयटीवर खडाजंगी होऊन बहुसंख्य ग्रामस्थांनी आयआयटी प्रकल्पाविरोधात ठराव घेण्याचा आग्रह धरला. शेवटी ग्रामस्थांनी हात उंचावून विरोध नोंदविल्याने विरोधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
या विषयावरुन ग्रामसभेत बराच गोंधळ उडाला. सरपंच राजेश गावकर यांनी मळकर्णे गावातील कुठलीही जमीन आयआयटी प्रकल्पासाठी जात नाही. या प्रकल्पाबाबत चर्चेसाठी पुन्हा खास ग्रामसभा बोलावू, असे सांगितले.
मागच्या ग्रामसभेत डावलला विषय
मळकर्णे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये आयआयटी प्रकल्पाचा मुद्दा मांडण्यात आला. मागील ग्रामसभेत आयआयटी प्रकल्पाबद्दल चर्चा करायला न दिल्याबद्दल ग्रामस्थांनी टीका केली. नागवे भागातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत आम्हाला ग्रामसभेत आयआयटी प्रकल्पावर चर्चा करायची आहे अशी लेखी मागणी केली होती. थ्यामुळे वादळी चर्चा झाली.
गावची जमीन जात नाही : सरपंच
सरपंच राजेश गावकर यांनी मळकर्णे गावातील कुठलीही जमीन या प्रकल्पाला जात असेल तर त्याला आमचा विरोध राहील. आपण प्रकल्पाविरोधात या लोकांबरोबर राहीन, असे सांगितले.
आयआयटी चर्चेसाठी खास ग्रामसभा
सरपंच राजेश गावकर यांनी, आयआयटी प्रकल्पाला काही मोजक्या लोकांचा विरोध असून तेच लोकांची दिशाभूल करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लोकांची समजूत काढली होती तरीही आयआयटी प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी खास ग्रामसभा बोलाविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थ किरण मळकर्णेकर यांनी सांगितले की या भागातील जमीन आयआयटीसाठी जात आहे. थ्याबाबत त्यांच्याकडे जो पुरावा होता तो त्यांनी ग्रामसभेसमोर मांडला. यावेळी त्यांनी काही भूखंडांचे सर्वे क्रमांकही दाखविले. ते म्हणाले की, नागवे भागातील जमीन प्रकल्पासाठी संपादन करुन घेतली आहे. या कागदपत्रावर जिथे संपादन केल्याचा उल्लेख आहे, तिथे असिस्टंट डायरेक्टर सीएडी दीपक गायतोंडे आणि या कागदपत्रावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची स्वाक्षरी आहे.