राष्ट्रवादीचे आयोजन; अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य; आ.जयंत पाटील, प्रतिक पाटील यांची उपस्थिती; वाळवा तालुका सर्वोत्तम बनवण्याचा संकल्प
इस्लामपूर प्रतिनिधी
देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना, ज्यांनी-ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आणि स्वातंत्र्यानंतर देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी कष्ट घेतले त्यांना मशाल रॅलीने आदरांजली अर्पण केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजीमंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे व्यक्त केली. येत्या काही वर्षात वाळवा तालुका हा देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आझाद चौकापासून कचेरी चौकापर्यंत मशाल फेरी काढण्यात आली. या फेरीचे कचेरी चौकात जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. युवा नेते प्रतिक पाटील हे प्रमुख उपस्थित होते. आ. पाटील पुढे म्हणाले, इंग्रजांनी दीडशे वर्षे आपल्यावर राज्य केले. त्यांच्या जुलमी व अन्यायी राजवटी विरोधात देशात सर्वप्रथम उमाजी नाईक यांनी बंड पुकारले. 1885 साली देशात काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीचा पुकारा केला. अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले, हालअपेष्टा सहन केल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश स्वतंत्र झाला. त्यावेळी गरीबी, रोगराई, अज्ञान, अंधश्रद्धा मोठय़ा प्रमाणात होती. मात्र आपल्या देशातील धुरिणांनी गोर-गरीबांच्या घरापर्यंत शिक्षण नेत, देशात ज्ञान, विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण केला.
सध्या कोणाचा तरी द्वेष करण्याचा आवेश निर्माण केला जात आहे, हा देशाच्या प्रगतीला मारक आहे. देशात, जगात काय व्हायचे ते होईल, मात्र खरा प्रश्न हा आहे की, आता आपण कोणती दिशा घेणार? येत्या काही वर्षात तालुक्यात दर्जेदार शिक्षण देत तालुक्यातील मुले जगाच्या पाठीवर पाठविणे आणि तालुक्यातील बेघरांना घरे बांधून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. देशातील जनता फार हुशार आहे. कोणाची कधी पलटी करायची हे त्यांना चांगले माहीत आहे. राज्यातील सत्ता गेल्याबद्दल चिंता करू नका. जे जाते, ते परत येते हा निसर्गाचा नियम आहे.
यावेळी विजय पाटील म्हणाले, महात्मा गांधी व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचे देश स्वतंत्र्य करण्यात आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. बी. के. पाटील म्हणाले, गेल्या 70 वर्षात देशात झालेल्या विकासाचे आम्ही साक्षीदार आहोत. गावात एखादी सायकल आणली, तर सायकल बघायला गांव जमा व्हायचा. आज काय परिस्थिती आहे. ऍड. डांगे म्हणाले, आपल्या देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी योगदान करूया. सुस्मिता जाधव म्हणाल्या, गेल्या काही वर्षात लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. अरुण कांबळे म्हणाले, आरएसएसची विचारधारा अधिक बळकट करण्याचा डाव खेळला जात आहे.
यावेळी खंडेराव जाधव, संजय कोरे, दादासो पाटील, सुनीता देशमाने, रोझा किणीकर, संग्राम जाधव यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रारंभी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत केले. ऍड. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील, नेताजी पाटील, मुनीर पटवेकर, भालचंद्र पाटील, विराज शिंदे, संग्राम फडतरे, रणजित पाटील, सुहास पाटील, सचिन कोळी, स्वरूप मोरे, शिवाजी चोरमुले यांच्या सह शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात उपक्रम
आ. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आम्ही संपूर्ण राज्यात मशाल फेरी उपक्रम हाती घेतला आहे. राज्याच्या सर्व तालुक्यात मशाल फेरी काढून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण केली आहे. स्व. बापूंनी जोडलेली माणसं हे माझे मूळ भांडवल आहे. मी ते कधीही विसरलो नाही आणि प्रतिकही विसरणार नाही. आपण मला सातत्याने पाठिंबा देत आला, आणि मीही राज्याच्या चांगल्या निर्णयात मोठे योगदान केलेले आहे.