गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांचा दावा
पणजी : शॅकमालकांकडून लाच मागण्याच्या प्रकारात गोवा फॉरवर्ड पक्षानेही सरकारवर टीकास्र सोडले असून यात ’संघटित टोळी’ गुंतली असल्याचा दावा पक्षाचे नेते विकास भगत यांनी केला आहे. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. खाण आणि पर्यटन हे दोन्ही उद्योग म्हणजे खऱ्या अर्थाने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यातील खाणऊपी एक कणा मोडला आहे. त्यामुळे सध्या पर्यटनावरच सर्व मदार आहे. अशावेळी या व्यवसायातील लोकांचीही लाच आणि अन्य मार्गांनी सतावणूक होऊ लागली तर ही अर्थव्यवस्थाही बिघडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सध्यस्थितीतच हा व्यवसायही गोमंतकीयांच्या हातातून निसटू लागला आहे. टॅक्सी, खाजगी शॅकमालक, किनारी शॅकमालक, वॉटर स्पोर्टस्, गेस्ट हाऊस चालक, हॉटेल्स, लहान रिसोर्ट आदी धंदे गोमंतकीयाकडे होते. आज त्यात बिगरगोमंतकीयांनीही प्रवेश केला आहे. हे सर्व प्रकार सरकारी हस्तक्षेप आणि बेशिस्त कारभारामुळे होत आहेत. स्थानिकांची सतावणूक करून मागील दारातून दिल्लीवाल्यांना प्रवेश देण्याचे कटू षडयंत्र रचण्यात आले आहे, असे आरोप त्यांनी केले. यापूर्वी पर्यटनाशी संबंधित तक्रारींसाठी अॅप तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आजपर्यंत ते अॅप अस्तित्वात आलेले नाही. यावरून मुख्यमंत्री किंवा पर्यटनमंत्री यांना या प्रश्नात कोणतेही स्वारस्य नसल्याचेच सिद्ध होत आहे. याऊलट गोमंतकीयांना त्रास व मानसिक छळ करून धंद्यातून उठवायचे व त्यांचे धंदे दिल्लीवाल्यांच्या ताब्यात देण्याचे संघटीत षडयंत्र रचले जात आहे, असे भगत म्हणाले. याचे ज्वलंत उदाहरण हल्लीच मोप विमानतळावर एका दिल्लीस्थित व्यक्तीस होलसेल बार चालविण्यास परवाना देण्यावरून दिसून आले आहे. एरव्ही स्थानिकांना बारसाठी परवाना देतेवेळी शेकडो अटी, शर्ती, कागदपत्रे यांची मागणी करण्यात येते. परंतु हेच परवाने बिगरगोमंतकीयांना देताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येतात. यावरून हे सरकार गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण नष्ट करण्यास सरसावले आहे, हेच सिद्ध होत आहे, असा दावा भगत यांनी केला.