पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे उपलब्ध झाले आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 1.22 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दाव्याच्या रूपात देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी शुक्रवारी येथे दिली.
गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या महा एफपीसीच्या आठव्या सर्वसाधारण बैठकीत तोमर बोलत होते. महा एफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी स्वागत केले. तोमर म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत साडेअकरा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. पीक विमा योजनेचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नव्हता. म्हणूनच पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली. या योजनेअंतर्गत देशातील कोटय़वधी शेतकरी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या विमा योजनेचे कवच उपलब्ध झाले आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 1.22 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दाव्याच्या रूपात देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर मार्गावर धावणार पाचवी वंदे भारत ट्रेन
देशातील जवळपास निम्म्या लोकसंख्येकडे बँक खाते नव्हते. कोटय़वधी कुटुंबांना शौचालयाची सोय, वीज जोडणी, स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर या गोष्टींचा अभाव होता. ही विषमता दूर करण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत, घरोघरी शौचालय, जनधन खाते, सौभाग्य योजना अंतर्गत वीज जोडणी आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक घराला गॅस सिलिंडर तसेच प्रत्येक गावात धान्य पोहोचवले जात आहे. त्याचबरोबर गरीब कुटुंबातील लाखो भगिनींना बचत गटांमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.