जवळपास स्वातंत्र्यापासूनच भारत काही कायमस्वरुपी दुखण्यांनी ग्रासला आहे. त्यांमधील सर्वात महत्वाची दोन दुखणी चीन आणि पाकिस्तान ही आहेत. दोन्ही भारताचे शेजारी देश आहेत. भारताने त्याच्या शांततावादी धोरणानुसार आजवर त्यांची स्वतःहून कोणतीही कळ काढलेली नाही. तरीही हे देश भारताच्या वाईटावर असतात. कित्येकदा स्वतःच्या हिताचा बळी देऊन शांततेचे व्रत चालविणाऱया भारताला असे अशांतीप्रिय शेजारी लाभावेत, ही एक आश्चर्यकारक विसंगती आहे. सध्या त्यापैकी चीन हे दुखणे चर्चेत आहे. 2020 मध्ये चीनने लडाखमधील गलवान येथे एका संघर्षात भारताच्या 20 सैनिकांची हत्या केली. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले. त्यानंतर नुकताच चीनने अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न करुन पाहिला. तो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे. आपल्या सीमांचे संरक्षण आपली सेनादले प्राण पणाला लावून करीत आहेत. त्यांची कार्यक्षमता वादातीत आहे. तथापि, शांततावादी भारतावर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी इतके परिश्रम का करावे लागावेत आणि इतकी सैनिक आणि शस्त्रहानी सोसावी का लागावी, हा महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर भारत स्वतःच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पहिल्या नेतृत्वाने जणू जगाची शांतता हे आपलेच उत्तरदायित्व आहे, असा समज करुन घेतला होता. त्यामुळे स्वतःचा देश, त्याच्या सीमांची अधिकृत आणि अंतिमस्वरुपी आखणी करुन घेणे, आपल्या शेजाऱयांचा घातकीपणा लक्षात घेऊन संरक्षणाची भक्कम व्यवस्था करणे, संरक्षण व्यवस्था बळकट व्हावी यासाठी योग्य त्या आर्थिक धोरणांचा स्वीकार करुन अर्थव्यवस्था सुदृढ बनविणे इत्यादी कामांकडे पुरेसे लक्ष देण्यापेक्षा जागतिक शांततेची चिंता अधिक करुन स्वतःला वैश्विक ‘शांतीदूत’ म्हणून प्रसिद्धी मिळविण्यावरच लक्ष केंद्रीत केले होते असे दिसृन येते. हे करण्यामागचा हेतू उदात्त होता असे काही विचारवंतांचे म्हणणे आहे. ते खरे मानले तरी, केवळ हेतू चांगला असून चालत नाही. परिणाम काय होत आहे, याकडे लक्ष द्यावे लागते. परिणाम घातक झाला तर सद्हेतूने केलेली कृतीही वाया जाऊन मोठी हानी होते. या साध्या तत्वाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत. हे सत्य स्पष्ट केले की काहीजणांचा मस्तकशूळ जागा होतो. पूवींच्या बाबी कशाला उकरुन काढता ? सध्या काय आहे ते बघा. असा शहाजोग, साळसूद आणि राजकीयदृष्टय़ा सोयीस्कर असा उपदेश केला जाते. तथापि, इतिहासात काय घडले त्याचा मागोवा सातत्याने घेत राहिल्याशिवाय वर्तमानात असे का घडत आहे आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काय करावे, हे समजत नाही. वर्तमानातील स्थिती भूतकाळावरच अवलंबून असते आणि तो पुन्हा पुन्हा समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळत असताना भारत आणि चीन यांचे आर्थिक आणि सामरिक सामर्थ्य जवळपास समान होते, असे त्यावेळच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप केला असता समजून येते. काही तज्ञांच्या मते तर सामरिकदृष्टय़ा भारत अधिक समर्थ होता. कारण भारताच्या सैनिकांना दुसऱया महायुद्धात लढल्यामुळे युद्धाचा सराव होता. ब्रिटीशांची शस्त्रसामग्रीही भारताला मिळाली होती. तरी, तिचा पुरेपूर उपयोग न करता, निम्म्याहून अधिक काश्मीर पाकिस्तानच्या घशात जाऊ देण्यात आला. यात सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्वाच्या आणि मोक्याच्या पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश होता. शांततेच्या धोरणाची गुंगी चढल्याने झालेली ही चूक आता अतिशय महागात पडत आहे. अशीच गंभीर चूक तिबेटच्या संदर्भातही घडली असे दिसून येते. 1950 मध्ये चीनने तिबेटमध्ये घुसखोरी केली आणि पुढच्या 8 ते 9 वर्षांमध्ये तो देश गिळंकृत केला. भारतात ब्रिटीशांचे राज्य असताना त्यांनी चीनची सुप्त उपद्रवशक्ती ओळखून तिबेट हे ‘बफर झोन’ (निःपक्षपाती देश) म्हणून घोषित केला होता आणि त्याच्या संरक्षणासाठी तेथे सैन्य ठेवले होते. ते सैन्य काढून घेतल्यामुळे चीनला तिबेटचे रान मोकळे मिळाले. संपूर्ण तिबेटवर ताबा मिळविल्याने चीनच्या सीमा थेट भारताच्या सीमेला भिडल्या आणि भारताची सीमा कायमस्वरुपी असुरक्षित झाली. तिबेट घशात घालून चीनचे समाधान होणार नाही. त्याची वक्रदृष्टी भारतावर पडणारच हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ओळखले होते. त्यामुळे चीनचा संभाव्य धोका ओळखून आतापासूनच भारताच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी नेटाने कामाला लागा, असा मोलाचा सल्ला त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना एका पत्राद्वारे दिला होता, ही बाब काही तज्ञांनी पुराव्यानिशी मांडली आहे. तथापि, आपले नेतृत्व जागे झाले नाही. कारण त्याला ‘शांत’तेची झोप लागली होती. परिणाम व्हायचा तो झालाच, 1962 मध्ये चीनच्या हातून दारुण आणि मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव सैन्यबळाचा किंवा सामरिक क्षमतेचा नव्हता, तर शेजाऱयांना नीट न ओळखण्याची चूक करण्याच्या धोरणाचा होता. तेव्हा केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम आजपर्यंत आणि पुढेही भोगावे लागतील, हे निश्चित आहे. मात्र, भविष्यात असे होऊ द्यायचे नसेल तर आपण बलवान होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताचे सामर्थ्य गेल्या 75 वर्षांमध्ये वाढलेले नाही असे नाही. मात्र, चीनने ते अधिक प्रमाणात वाढविले आहे. कारण त्या देशाचे प्रारंभापासूनचे नेते स्वतःच्या देशाला बळकट करण्याच्या मागे लागले. त्यांनी जगाची चिंता केली नाही. त्यामुळे ते आज ‘केव्हाही यावे, टिकली मारुनी जावे’ अशा पद्धतीने आपली कळ काढू शकतात. आपले विरोधी पक्षही अशा बाबींचा राजकीय लाभ उठविण्यात मग्न असतात. आपण सत्तेवर होतो तेव्हा चीनने भारताची किती हानी केली होती आणि कसा लडाखचा मोठा प्रदेश हिसाकावला होता ते विसरतात. लोकांनीही ते विसरावे अशी त्यांची इच्छा असते. पण लोकांची स्मरणशक्ती इतकी दुर्बळ नसते. तेव्हा, विद्यमान सरकारवर दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी मिळून देशाची संरक्षण व्यवस्था बळकट करणे हाच एकमेव उपाय आहे. नुसती चर्चा करुन किंवा शांतीपाठाचे आवर्तन करुन चीनसारखा महत्वाकांक्षी शेजारी मानणार नाही, याची सर्वांनीच जाण ठेवावी.
Previous Articleबांगलादेशचा पहिला डाव 227 धावात समाप्त
Next Article कधीच झुकणार नाही युक्रेन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.