वृत्तसंस्था/ कराची
श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’मधून माघार घेतल्याने यजमान पाकिस्तान सप्टेंबरमध्ये होणार असलेल्या आशिया चषक स्पर्धेतून माघार घेऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी प्रस्तावित केलेल्या ’हायब्रीड मॉडेल’नुसार, आशिया चषकाचे 3 ते 4 सामने त्यांच्या देशात आयोजित करायचे होते, तर भारताचा समावेश असलेले उर्वरित सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाणार होते.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर ही कल्पना मांडण्यात आली होती. तथापि, आता हे स्पष्ट झाले आहे की, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या सर्वांनी बीसीसीआयच्या स्पर्धेला पाकिस्तानमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. आशियाई क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आता व्हर्च्युअल पद्धतीने बैठक घेतील किंवा या महिन्याच्या शेवटी बैठक बोलावली जाईल, पण ती केवळ औपचारिकता असेल.
पीसीबीला आता जाणीव झाली आहे की, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनासाठीच्या त्यांच्या हायब्रीड मॉडेलच्या प्रस्तावाला पाठिंबा देत नाहीत, असे एका जाणकार सूत्राने सांगितले. पाकिस्तानला आशिया चषकाचे कोणतेही सामने त्यांच्या भूमीत आयोजित करण्याची संधी मिळाली नाही, तर पाकिस्तानची भूमिका काय राहील यासंबंधी चर्चा करण्यासाठी सेठी यांनी आधीच त्यांच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्प साधलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सेठी यांनी वारंवार सांगितले आहे की, जर ही स्पर्धा पाकिस्तानमधून एका तटस्थ देशात हलवली गेली, तर ते स्पर्धेत भाग घेणार नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार, तशा परिस्थितीत पीसीबी आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.