वृत्तसंस्था /इस्लामाबाद
काश्मिरी फुटिरवादी आणि दहशतवादी यासीन मलिकला भारतातील न्यायालयाकडून मृत्युदंड ठोठावला जाण्याची शक्यता पाहता पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. पाकिस्तानी विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत दया दाखविण्याची याचना भारताकडे केली आहे. तर काही दिवसांपूर्वी एनआयएने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज करत यासीन मलिकला मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली होती. यासीन मलिक हा टेरर फंडिंगप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, यासीन मलिक हा दहशतवादी कट रचणे, भारतीय सैन्यावर हल्ला करण्याप्रकरणी दोषी ठरला आहे. तसेच वायुदलाच्या 4 सैनिकांची यासीनने हत्या केली होती. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबिया यांच्या अपहरणामागील तो मुख्य सूत्रधार होता. यासीन मलिकचा खटला संपुष्टात आणला जावा अशी विनंती आम्ही भारताला करत आहोत. यासीनला गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान केले जावेत आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांदरम्यान स्वतंत्र स्वरुपात राहण्याची अनुमती दिली जावी अशी याचना पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने यासीन मलिकला काश्मीरचा नेता तसेच मानवाधिकारांचा रक्षक असे संबोधिले आहे.
यासीनच्या पत्नीची धावाधाव
यासीन मलिकला मृत्युदंडाच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी त्याची पत्नी मुशाल मलिकने पाकिस्तान सरकारला आवाहन केले होते. यासीनची भारतात हत्या होऊ शकते असा दावा तिने केला होता. यासीनच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आवाज उठवावा अशी मागणीही तिने केली होती. मुशाल पाकिस्तानात पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशन (पीसीओ)ची अध्यक्ष आहे. कुठलाच काश्मिरी मृत्यूला घाबरत नाही, यासीन मलिक एक व्यक्ती नसून एका आंदोलनाचे नाव असल्याची शेखी तिने मिरविली होती.
यासीन मलिकचा अनेक गुन्ह्यांमध्ये हात
यासीन मलिक हा काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील राहिला आहे. 1980 च्या दशकात त्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर भारतात येऊन त्याने हिंसक कारवाया घडवून आणल्या होत्या. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा तो एरिया कमांडर झाला होता. यानंतर यासीनने दहशतवादी अशफाक वाणी, हामिद शेख, जावेदर अहमद मीर यांच्यासोबत हाजी गट स्थापन केला होता. 1989 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबिया यांच्या अपहरणामध्ये तो सामील होता. रुबियाच्या सुखरुप मुक्ततेकरता भारत सरकारने 5 दहशतवाद्यांना सोडले होते.