काश्मीर मुद्दाही परस्पर सहकार्याने सुटावा ः पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानला भारतासोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे वक्तव्य करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संबंधित ठरावांनुसार जम्मू-काश्मीर वादावर न्याय्य आणि शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. इस्लामाबादमध्ये ही बैठक झाल्यानंतर एक्स्प्रेस ट्रिब्यूनने याबाबत माहिती दिली आहे.
दक्षिण आशियामध्ये शाश्वत शांतता आवश्यक असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने याबाबत भूमिका बजावली पाहिजे, यावर पंतप्रधान शाहबाज यांनी भर दिला. तसेच जम्मू आणि काश्मीर वादाच्या न्याय्य आणि शांततापूर्ण ठरावाशी संबंधित ‘युएनएससी’नुसार काश्मिरी लोकांचे संकल्प आणि इच्छा या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी अपरिहार्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यानंतर शरीफ यांचे वक्तव्य आले आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतंत्र परराष्ट्र धोरणासाठी भारताचे कौतुक केले होते. भारताने रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. पाश्चिमात्य देशांची मागणी मान्य न केल्याने आणि खरेदी सुरू ठेवल्याबद्दल इम्रान खान यांनी भारताचे वारंवार कौतुक केले आहे. गेल्या आठवडय़ात लाहोरमध्ये एका मोठय़ा मेळाव्यादरम्यान इम्रान खानच्या पीटीआय पक्षाने एक व्हिडीओ दाखविला होता. त्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या भाषणाचा संदर्भ देण्यात आला होता.
जम्मू काश्मीर आमचेच ः भारत
शेजारी राष्ट्र असल्यामुळे भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत. पण, त्यांनी दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरण तयार करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे. तसेच जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहील, असेही भारताने पाकिस्तानला वेळोवेळी बजावून सांगितले आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी असल्याचेही भारताने म्हटले आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्याची घोषणा केल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये द्विपक्षीय संबंध अधिकच बिघडले आहेत.