अध्याय अठ्ठाविसावा
आत्तापर्यंतच्या सत्तावीस अध्यायांच्या निरुपणातून, भगवंतांच्या मुखातून आत्मज्ञान ऐकून उद्धव ज्ञानसंपन्न झाला होता. अर्थातच ज्ञानसंपन्न झाल्यामुळे त्याला त्या ज्ञानाचा आत्यंतिक अभिमान होऊ नये, सर्व जग मूर्ख असून मीच काय तो एकटा शहाणा असा अहंकार त्याला होऊ नये ह्या काळजीपोटी भगवंत उद्धवाचा कळवळा येऊन पुढील निरुपण करत आहेत.
ह्या निरुपणात मुख्यत्वेकरून गुणदोषांची कथा भगवंत सांगत आहेत. त्यामागचे कारण असे की, जेथे गुणदोषांची चर्चा चालू असते तेथे ज्ञान पूर्णपणे मावळून जाते. एव्हढेच नव्हे तर मिळवलेल्या ज्ञानाचा अभिमान मात्र जोर करतो आणि तोच साधकाला बाधक ठरतो. अभिमानाबद्दल काय सांगावं त्याने प्रत्यक्ष सदाशिवाला जीवभावाला आणलं तिथं सामान्य मनुष्याचा पाड कितीसा लागणार? व अहंकारी जीवाची मुक्तता तरी कशी होणार? गुणदोषांची चर्चा जेथे ईश्वरच करू लागले तर इतरांना काय दोष लावणार? हे सर्व लक्षात घेऊन उद्धवाच्या स्वार्थासाठी भगवंताना कळवळा येऊन ते हे निरुपण करत आहेत. अभिमान हा नेहमीच चोर पावलाने मनात शिरत असतो. त्यामुळे हे ज्ञानाभिमानाचे बाधकपण साधकांच्या बिलकुल लक्षात येत नाही. तसे उद्धवाचे होऊ नये म्हणून स्वत: भगवंत हे निरुपण करत आहेत. हे समजल्याशिवाय पूर्ण ब्रह्मज्ञान होत नाही.
उद्धवाला तर भगवंतांना पूर्ण ब्रह्मज्ञान करून द्यायचे आहे कारण उद्धवाचा जन्म यादव वंशात झालेला असल्याने आणि यादव कुळाचा शापामुळे निर्वंश होणार असल्याने त्यापासून उद्धवाचा बचाव करावा म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मज्ञान भगवंत सांगत आहेत. ज्याला ब्रह्मज्ञान झाले असेल त्याला शापबंधन बाधू शकत नाही. हे जरी खरे असले तरी जोपर्यंत उद्धव भगवंतांच्या जवळ आहे तोपर्यंत तो भगवंताशी एकरूप झाल्यासारखाच असल्याने तो भगवंताना सोडायला मुळीच तयार नाही. ज्याप्रमाणे माशीला साखरेजवळच रहायचे असते त्याप्रमाणे उद्धव भगवंताना चिकटून बसलेला आहे. ह्या परिस्थितीत, त्याचा नाश होऊ नये म्हणून भगवंतानी उद्धवाला बळजबरीने दूर जायला सांगितले तर उद्धव जीवच देईल अशी भगवंताना खात्री होती. उद्धवाला भगवंताना सोडून कुठही जायचं नव्हतं कारण तो त्यांना केवळ सगुण रूपातच पहात होता, त्यांच्या सगुण रूपाशी तो एकरूप झालेला होता. त्याला सोडून वैकुंठाला जायची भगवंतानाही इच्छा होत नव्हती. शापामुळे यादव कुलाबरोबर उद्धवाचाही नाश होऊ नये आणि त्यानाही वैकुंठाला जाता यावं ह्या उद्देशाने, भगवंत उद्धवाला ब्रह्मज्ञानाची परिपूर्ण अवस्था समजावून सांगणार आहेत.
जेणेकरून त्याच्या हे लक्षात येईल की, परब्रह्म निर्गुण, निराकार असून भगवंतांच्या सगुण रूपापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते सर्वत्र व्यापून आहे. त्या परब्रह्मातच सर्व भुते सामावलेली आहेत. एकदा ह्या गोष्टीची खात्री पटली की मग भगवंतांच्या सगुण रूपाचा वियोग उद्धव सहज सहन करेल कारण तो कुठेही गेला तरी निर्गुण अवस्थेत भगवंत सदैव त्याच्या बरोबर असतील असा विश्वास त्याला वाटू लागेल. त्यादृष्टीने पुढील निरुपण भगवंत करणार आहेत. निर्गुण परब्रह्म हे नि:शब्द असते पण भगवंत सगुण रुपात असल्याने ते नि:शब्दाचा सोलीव शब्द सांगणार आहेत. ज्यांच्या निश्वासातून वेद प्रकटले असे थोर भगवंत उद्धवाच्या हितासाठी विशुद्ध ज्ञान सांगत आहेत. ह्या विश्वाची निर्मिती मायेपासून झाली आहे आणि माया म्हंटली की तिच्यासोबत त्रिगुणांचा उल्लेख हवाच. भगवंत त्रिगुणांच्याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, संसारात मुख्य तीन गुण आहेत. त्यामुळे माणसेही तीन प्रकारची आहेत तशीच त्यांची कर्मेही तीन प्रकारची असतात. शांत, दारूण आणि मिश्र असे कर्मांचे तीन प्रकार आहेत. वर मी सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या कर्मांची निंदा किंवा स्तुती करू नये. कारण एकाचे कौतुक केले की इतर दोघांना गौण लेखल्यासारखे आपोआपच होते.
क्रमश: