सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : रामदास केळकर यांच्या ‘नाती’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / पणजी
प्रत्येक पालकाला आपला मुलगा प्रगती करावा अशी इच्छा असते. याशिवाय ते प्रोत्साहन द्यायलाही तयार असतात. परंतु नेमके पालकच प्रगतीबाबतची उपलब्ध असलेल्या क्षेत्राबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पालकांना करिअरबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जर पालकांना करिअर मार्गदर्शन केले तर मुलांना योग्यरित्या प्रोत्साहन मिळाले तर तो मुलगा यशाची उंची गाठू शकतो. प्रत्येक मुलांमध्ये कुठली ना कुठली कला असते. ती कला समजून त्याला प्रोत्साहन दिले तर तो मुलगा नक्कीच यश प्राप्त करू शकतो असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी तरूण भारत पणजी कार्यालयात आयोजित केलेल्या रामदास केळकर यांच्या ‘नाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनवेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी प्रकाशक कृष्णा भोसले, वैभव फोंडेकर, लेखक रामदास केळकर, तरूण भारतचे संपादक सागर जावडेकर, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रवी पाटील, व्यवस्थापक मंगेश काळे, वितरण व्यवस्थापक शंकर जाधव, पत्रकार जय नाईक, सोशल मीडीयाचे रितेश देसाई, पत्रकार प्रज्ञा मणेरीकर, संपादकीय विभागातील रिमा केसरकर, प्रीती मराठे, श्रमी भोंसुले, अमिता सावंत, छायाचित्रकार तुळशीदास राऊळ, उमेश बाणास्तरकर उपस्थित होते.
लेखक आणि पत्रकार यांचे जवळचे नाते आहे. पत्रकार लेखक असला तर आणि लेखकाला पत्रकारिता समजली तर उत्तमच. आज तांत्रिकदृष्टय़ा प्रचंड प्रमाणात प्रगती झाली असून तुमचे विचार मांडण्यासाठी उत्तम साधने उपलब्ध झाली आहेत. विचारपत्र, बातमीपत्र आणि तक्रारपत्र ही वृत्तपत्राची वाटचाल आहे. आता वृत्तपत्राच्या मदतीला ऑडिओ, व्हिडिओ तंत्रज्ञान आले आहे. पूर्वी रेडिओद्वारे वृत्तप्रसारण केले जायचे. आता टीव्हीच्या माध्यमातून सचित्र वृत्तप्रसारण केले जाते. नवीन प्रगत यंत्रणेमुळे जगाच्या पाठीवरील कुठलीही बातमी पाहायला मिळते. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात चांगले पत्रकार, लेखक असणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक युगात सामोरे जाण्यासाठी विलक्षण धडपड करणे गरजेचे आहे , असे मत किरण ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केले.
‘नाती’ या पुस्तकाची निर्मिती तरुण भारतमुळेच झाले असल्याने हे पुस्तक तरुण भारतला समर्पित केले आहे. करिअर मार्गदर्शन माझ्या जवळचा विषय आहे. जेव्हा सोशल मीडिया नव्हती तेव्हा गावोगावी ठराविक लोकांनीच करिअर हा शब्द ऐकला होता. त्या काळात पेडणे तालुक्यातील सर्वच शाळेमध्ये हा विषय मांडला आहे. तसेच करिअर मार्गदर्शनचा विषय अपघाताने माझ्याकडे आला. जर तुमच्यात नाविन्यता आणि उत्सुकता असेल तर आताची पिढीची मुले तुमचे नक्की ऐकतील. गोव्यात अनेक मुलांना करिअरबाबत माहिती नाही. गोव्याचे साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के असले तरी अनेकांना फाईन आर्ट्स आणि आर्ट्समधील फरक कळत नाही. यात चूक मुलांची शिक्षकांची आहे. शिक्षकांनी मुलांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे. तरूण भारतने वृत्तपत्राच्या माध्यमातून पालकांना करिअर मार्गदर्शन करण्याबाबत सहकार्य केले तर पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच उपयोग होईल असे मत लेखक रामदास केळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
करिअर मार्गदर्शन देऊन ज्ञानकक्षा उंचावण्याचे कार्य रामदास केळकर करीत आहेत. आतापर्यंत केळकरांची 27 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नाती या पुस्तकात 35 असे वाचनीय ललित लेख आहेत. प्रत्येक लेखातून त्यांनी ज्या गोष्टी माहिती नाही त्यांचा उलगडा केला आहे. सर्वांसाठी उपयुक्त असून जीवनातील वास्तव्य आणि प्रेरक पद्धतीने जीवनात मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून त्यांनी केला आहे, असे प्रतिपादन सागर जावडेकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश काळे यांनी केले तर आभार सागर जावडेकर यांनी मानले.