प्रतिनिधी,कोल्हापूर
शहराच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणाऱ्या परिख पुलाखालून सुरु असणारी वाहतुक, पादचाऱ्यांची ये-जा धोकादायक आहे. रेल्वे प्रशासनाने पुलावर वर्षभरात दोन नवीन ट्रॅक, प्लॅटफॉर्म केल्याने पुलावरील भार 25 पटीने वाढला आहे. त्यामुळे पुल कोसळून दूर्घटना घडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात परिखपुल नुतनीकरण समितीचा रेल्वे, महापालिका प्रशासनाकडे साडेतीन वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र या दोन्ही ढिम्म प्रशासनाकडून केवळ चालढकल होत आहे. त्यामुळे पारिखपुल प्रश्नी रेल्वे, मनपाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसची दखल न घेतल्यास दोन्ही संस्थाना न्यायालयात खेचण्याचा इशारा परिखपुल नुतनीकरण समितीचे फिरोज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शेख म्हणाले, रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटकातून सुरु असणारी वाहतुक सुमारे 30 ते 35 वर्षांपुर्वी कोणताही पर्याय न देता बंद केली. त्यामुळे आपसुकच हि वाहतुक परिख पुलाखालून सुरु झाली. मात्र हा पूल म्हणजे पाण्याचा निचरा होणार मार्ग असल्याने पुला खालून सुरु असलेल्या वाहतुकीला रेल्वे, महापालिका प्रशासनाची अधिकृत मान्यता नाही. त्यातच आता रेल्वे फाटक येथे भिंत उभारुन पादचाऱ्यांची होणारी ये-जा रेल्वेने बंद केली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनाही आता ये-जा करण्यासाठी परिख पुलाखालून जावे लागते. पुलाखालून वाढलेला वाहतुकीचा ताण, आणि नवीन ट्रॅक, प्लॅटफॉर्म मुळे पुलावर वाढलेला भार भविष्यात धोकादायक ठरु शकतो, असे शेख यांनी सांगितले.
आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे म्हणाले, परिख पुलाची असुरक्षितता लक्षात घेता आर्किटेक्ट असोसिएशनकडून विस्तारीकरण व मजबुतीकरणासह नुतनीकरणाचा डिझाईनसह आराखडा तयार करुन तीन वर्षांपुर्वीच महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे. यानंतर जिल्ह्यातील आमदार, खासदार यांचीही भेट घेवून त्यांना या प्रश्नाची गंभीरता सांगितली होती. मात्र याप्रश्नी सर्वच पातळीवर उदासिनता दिसून येत असल्याने एखादी दूर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का प्रश्न कोराणे यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेला सुधीर हंजे, अॅड. अजितसिंह पवार, रणजीत कोळेकर, सुभाष कोळी, सचिन घाटगे, राजेशाम रेंगडे, अशोक रेंगडे आदी उपस्थित होते.