पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, अपघातांच्या घटनांत वाढ
बेळगाव : शहर आणि उपनगरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. अनगोळ परिसरात गटारीचे बांधकाम, त्याचप्रमाणे ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. लोहार गल्ली आणि नाथ पै नगरमध्ये गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पण महिना झाला तरी गटारीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. सध्या काम करणारा कंत्राटदार गायब झाल्याने हे काम अर्धवट झाले आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अर्धवट कामामुळे अपघात देखील घडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. गटारी बांधण्यासाठी चरी खोदून ठेवण्यात आल्या असून नागरिकांना घरात जाताना कसरत करावी लागत आहे. तर लहान मुलांना देखील धोकादायक बनले आहे. संध्याकाळच्या वेळी सायकल चालवणारा मुलगा या अर्धवट कामामुळे सायकलसह कोसळला. या ठिकाणी गटारीमध्ये पडणार तोच थोडक्यात बचावला. अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. सदर काम महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आले होते. काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनासह कंत्राटदाराने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे होते. पण याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. काम पूर्ण करण्यासाठी नाथ पै नगर आणि लोहार गल्लीतील रहिवाशांनी कंत्राटदाराला अनेकवेळा सूचना केल्या. तसेच महापालिकेच्या वतीनेदेखील कंत्राटदाराला सूचना केली होती. तरीदेखील कंत्राटदाराने याकडे कानाडोळा केला आहे. सांडपाण्याचा निचरा होत नाही. एका ठिकाणी पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. पण खोदलेल्या चरी धोकादायक ठरू लागल्या आहेत. सध्या कंत्राटदार गायब असल्याने काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन काम तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्याची मागणी होत आहे.