दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालात सलग बाराव्या वर्षी कोकण बोर्डाचा निकाल राज्यात अव्वल राहिला आहे. या निकालातून कोकणातील मुलांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करून कोकणच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पॅटर्न तयार केला आहे. शैक्षणिक गुणवत्ता असूनही मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडणारी कोकणातील मुले आता यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत चमकू लागली आहेत. हे स्पर्धा परीक्षांबाबत मोठे आशादायी चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कोकणातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दहावी व बारावी परीक्षेत कोकणचाच झेंडा फडकवला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने सलग बारा वर्षे बाजी मारली. त्यामध्ये एकूण निकाल त्याचबरोबर मुलींचा निकाल या दोन्ही बाजूनी राज्यात गौरवास्पद कामगिरी झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालक यांचे कौतुकच आहे.
शिक्षणामध्ये सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी आजकाल चढाओढ लागलेली असते. विद्यार्थ्यांबरोबर पालकही अभ्यासाची काळजी घेत असतात. ट्युशन लावण्यात येते. मात्र ग्रामीण भागात ट्युशन व इतर सुविधांचा अभाव असतो किंवा असून सुद्धा परिस्थितीमुळे शक्य नसते. परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा दहावी, बारावीच्या निकालात घवघवीत यश मिळवत आपणही कुठे मागे नाही हे दाखवून दिले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेत सलग बाराव्या वर्षी कोकण विभागाने आपले अग्रस्थान ढळू दिलेले नाही. कोकण बोर्ड स्थापन होण्यापूर्वी पुणे व कोल्हापूर बोर्डाला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा जोडलेला होता. परंतु स्वतंत्रपणे कोकण परीक्षा बोर्ड स्थापन व्हावे, अशी मागणी होऊ लागल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ती मागणी मंजूर केली. त्यानंतर स्वतंत्रपणे कोकण परीक्षा बोर्ड स्थापन झाल्यावर पहिल्या वर्षापासून 2023 पर्यंत सलग बारा वर्षे कोकण बोर्ड आघाडीवर राहिली आहे. यावर्षी बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 97.51 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 95.22 टक्के निकाल लागला आहे. दहावी परीक्षा निकालात राज्याचा 93.83 टक्के निकाल लागला. त्यात कोकण विभागाचा 98.54 टक्के. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 99.15 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 97.90 टक्के निकाल लागला आहे.
सलग बारा वर्षे दहावी व बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखणे तसे सोपे नाही. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. म्हणूनच बाराव्या वर्षीही राज्यात शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. साहित्यिक, कवी आणि इतर विविध क्षेत्रात चमकणारे लोक कोकणातीलच अधिक आहेत. दोन्ही जिल्हे ग्रामीण भागात मोडणारे असले, तरी शाळा सुसज्ज आहेत. शिक्षण देणारे शिक्षकही दर्जेदार शिक्षण देत आहेत. प्राथमिक शाळांमधून शिक्षणाचा पाया भक्कम केला जातो. त्यामुळे पुढे जाऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यश मिळवत आहेत.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शिक्षण प्रवाहापासून कुणी बाजूला पडत नाहीत. 14 वर्षांखालील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, याची काळजी घेतली जाते. प्राथमिक शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने दिले जाते. विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. दोन्ही जिल्ह्यात प्रज्ञाशोध परीक्षा सुरू करून बुद्धिमत्ता वाढविण्याचे काम केले जात आहे. शिष्यवृत्ती सराव परीक्षाही घेऊन अभ्यासक्रमाची उजळणी घेतली जाते. विविध संस्था व शिक्षक संघटनाही त्यासाठी मदत करीत असतात. त्यामुळे कोकणातील शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी व पालकांनी कितीही मेहनत घेतली, तरी ज्ञानदान करणारे शिक्षकही सर्वात महत्त्वाचे आहेत. जर शिक्षक चांगले आणि पुरेसे असतील, तर निश्चितच मुलांची आपोआपच शैक्षणिक प्रगती होत जाते. ज्ञानदानाचे हे कार्य कोकणामध्ये शिक्षकवर्ग उत्तम पद्धतीने करतात. परंतु, प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचीच कमतरता निर्माण झाल्याने कोकणातील शैक्षणिक गुणवत्तेला धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत आंतरजिल्हा बदली होऊन गेलेले शिक्षक आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमुळे जवळपास अडीच हजार शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. काही शाळा तर शिक्षकांविनाच आहेत. असे असताना शिक्षक भरतीबाबत शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जवळच्या काळात शिक्षक भरती होईल, याची चिन्हे काही दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्ता घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोना काळात शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण घ्यायचे, तर ग्रामीण भागात नेटवर्क नसायचे. त्यामुळे काही शिक्षक घरोघरी जाऊन अभ्यास घेत होते. अशा परिस्थितीत कोकण विभागाने कोरोना काळात आणि कोरोनानंतरही दहावी, बारावी परीक्षेच्या निकालात अव्वल स्थान कायम टिकवून ठेवले. परंतु, शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, याला जबाबदार कोण? शिक्षक नसल्याने नाईलाजास्तव बरेच पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवू लागले आहेत. एकीकडे मराठी शाळा टिकवण्याची धडपड केली जात असताना शिक्षकच नसतील, तर शाळेत येणाऱ्या मुलांचं स्वागत कशाला हवं, असा प्रश्न पडतो. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकूनच कोकण विभागातील मुलांनी दहावी, बारावी परीक्षेत यश मिळविलेले आहे. हे यश टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांची सर्व रिक्त पदे भरायला हवीत. दहावी, बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने सलग बाराव्या वर्षी सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेत कोकणचे नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. परंतु, दहावी, बारावीनंतर हीच मुले कुठे जातात, हा प्रश्न पडतो. स्पर्धा परीक्षांमधून ही मुलं दिसत नाहीत. मग कोकणचं टॅलेंट जाते कुठे, हा प्रश्न होता. मात्र हे चित्र आता हळूहळू बदलू लागले आहे. मागील दोन, तीन वर्षांत यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत कोकणातील मुले चमकू लागली आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात यूपीएससी परीक्षेत सिंधुदुर्गातील वैभव दाभोलकर, तुषार पवार, दयानंद तेंडोलकर तसेच एमपीएससी परीक्षेत तृप्ती टेमकर यांनी अभूतपूर्व यश मिळविले. हे यश निश्चितच युवापिढीला प्रेरणादायी ठरेल व कोकणातील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढेल.
स्पर्धा परीक्षांमध्ये आशादायी चित्र निर्माण झाले आहे, हे खरं असले तरी त्यावर समाधान मानणे योग्य ठरणार नाही. कोकणातील मुलांमध्ये ठासून गुणवत्ता भरलेली आहे. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत जाईल. यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा दूरच राहिल्या, तलाठी किंवा पोलीस भरतीतही कोकणातील मुले मागे पडताना दिसतात. त्यामुळे आगामी काळात शासनकर्त्यांनी तालुकावार स्पर्धा परीक्षा पेंद्रे सुरू करायला हवीत. तरच शैक्षणिक गुणवत्ता चांगली असणारी कोकणातील मुले स्पर्धा परीक्षांमध्येही मोठ्या प्रमाणात चमकू लागतील आणि दहावी, बारावीनंतर नोकरीच्या शोधात स्थलांतरीत होणारी मुले थांबतील.
संदीप गावडे