पंतप्रधानांना उद्देशून केली होती आक्षेपार्ह टिप्पणी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांना आसाम पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. परंतु काही तासातच सर्वोच्च न्यायालयामुळे त्यांना अंतरिम जामीन मिळाला होता. खेडा यांच्यावरील कारवाईसंबंधी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी वक्तव्य केले आहे. खेडा यांनी स्वतःच्या टिप्पणीबद्दल विनाअट माफी मागितली असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे.
आरोपीने (पवन खेडा) बिनशर्त माफी मागितली आहे. सार्वजनिक स्थळांचे पावित्र्य कायम ठेवत आता कुणीच राजकीय भाषणात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणार नाही अशी अपेक्षा असल्याचे शर्मा यांनी शुक्रवारी म्हटले आहे. शर्मा यांनी यापूर्वी खेडा यांच्यावरील पोलिसांच्या कारवाईला योग्य ठरविले होते. गुन्हा झाला असल्यास खेडा आकाशात असो किंवा जमिनीवर त्यांना अटक करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. आसाम पोलीस स्वतःचे कर्तव्य बजावत होते असे शर्मा यांनी म्हटले आहे.
खेडा यांनी केलेल्या टिप्पणीप्रकरणी देश काँग्रेसला माफ करणार नाही. पंतप्रधानांना उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱया खेडा यांना काँग्रेस नेतृत्वाचा वरदहस्त आहे. काँग्रेसच्या या भयानक टिप्पणींना भारत विसरणार नाही तसेच माफही करणार नसल्याची टीका शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
20 फेब्रुवारी रोजी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेडा यांना अटक करण्यात आली होती. अटलबिहारी वाजपेयी जेपीसी स्थापन करू शकतात, मग नरेंद्र गौतमदास मोदींना कोणती समस्या आहे अशी वादग्रस्त टिप्पणी खेडा यांनी केली होती. नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नावात वादग्रस्त बदल करत त्यांनी ही टिप्पणी केली होती.