पीडीओंकडे विवाह नोंदणीचा अधिकार : 2018-19, 2020-21 मध्ये 5 हजार 500 बालविवाह रोखण्यात यश
प्रतिनिधी /बेळगाव
बालविवाह होण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. विशेष करून ग्रामीण भागामध्ये बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालणे आता ग्राम पंचायत पीडीओंच्याच हातात आहे. त्यांच्याकडे विवाह नोंदणीसाठी अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यामधून तरी परिवर्तन होऊन बालविवाह टाळले जाणार आहेत काय? हे आता भविष्यात पहावे लागणार आहे.
विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू दाखला आता ग्राम पंचायतीच्या माध्यमातून मिळणार आहे. याबाबतचा आदेश पंचायत राज खात्याने नुकताच काढला आहे. दरम्यान जे ग्राम पंचायत विकास अधिकारी विवाहाची नोंदणी करु शकतात तेच अधिकारी आता बालविवाह रोखूही शकतात. कारण ग्राम पंचायतीच्या माध्यमातून याची माहिती त्यांना तातडीने मिळू शकते आणि बालविवाहांना आळा घालण्यासाठी खूप मदत होऊ शकते, असा जाणकरांचा अंदाज आहे. मात्र त्यासाठी पीडीओंनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सरकारने पीडीओंना अधिकार दिला आहे. त्यामुळे निश्चितच बालविवाह रोखण्याला मदत होऊ शकते, असे समाज सुधारक व अधिकाऱयांचे मत आहे. 2021-22 मध्ये राज्यभरात जवळपास 2 हजारांहून अधिक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तर बालविवाहाविरोधात 280 हून अधिक एफआयआर नोंद करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात 2018-19 व 2020-21 दरम्यान 5 हजार 500 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. विविध जिह्यातील सुमारे 400 जणांनी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले आहेत.
विवाह नोंदणी सक्तीची करणे आवश्यक
विवाह नोंदणी सक्तीची नसल्यामुळे विवाह दांपत्य तसेच त्यांचे कुटुंबीय नोंदणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक विवाहांची नोंदच होत नाही, असे राज्य ग्राम पंचायत पीडीओ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. आता आम्हालाच विवाह नोंदणी करण्यासाठी अधिकृत केले आहे. त्यामुळे निश्चितच आम्ही जास्तीत जास्त विवाह नेंदणी करण्यासाठी प्रयत्न करु, विवाह झालेल्या व्यक्तींना विवाह नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पीडीओ करू शकतात जनजागृती पीडीओंचा स्थानिक पातळीवरील नागरिकांशी वारंवार कामानिमित्त संपर्क येत असतो. त्यामुळे विवाह नोंदणी तसेच बालविवाहाच्या बाबतीत ते नागरिकांना समुपदेशन करतील. त्यामुळे याचा निश्चितच फायदा होईल, असे बालहक्क कार्यकर्ते वासुदेव शर्मा यांनी सांगितले. तालुका पातळीवर तसेच गाव पातळीवर होणाऱया विवाहांवर ते सहज नजर ठेवू शकतील. त्यामुळे बालविवाह रोखण्यास मदत होणार आहे.