राज्यपालांकडे अध्यक्षपद : विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यात शांतता समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांचा समावेश आहे. याशिवाय या समितीमध्ये निवृत्त ज्येष्ठ नागरी अधिकारी, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांचे प्रतिनिधी यांचाही समावेश आहे. गृह मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली.
ईशान्येकडील मणिपूर राज्यात सुरू असलेला हिंसाचार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यात 3 मे पासून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 310 जखमी झाले असून 37 हजारांहून अधिक लोकांना 272 मदत छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले आहे. कित्येक गावे रिकामी झाली. हल्लेखोरांनी शेकडो वाहने पेटवून दिल्यामुळे अजूनही तणाव निवळलेला दिसत नाही.
अलीकडेच मणिपूरच्या कुकी समुदायाच्या सदस्यांनी ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी हाती घेतलेल्या फलकांवर ‘कुकी समाजाच्या लोकांच्या जीवाचे रक्षण करा’ असा संदेश लिहिला होता. निदर्शनादरम्यान लोकांनी याविरोधात घोषणाबाजीही केली. त्याचवेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी चार आंदोलकांना गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानात जाण्यास परवानगी दिली. तर इतरांना जंतरमंतरवर पाठवले. यादरम्यान राज्यातील परिस्थिती आणि मागण्यांवर विचारमंथन करण्यात आले होते.
राज्यात हिंसाचार भडकल्यानंतर अमित शहा यांनी मणिपूरला भेट दिली. यादरम्यान त्यांनी विविध यंत्रणांची बैठक घेत सूचना केल्या. त्यानंतर सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा सर्व लोकांना मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले. आता यासंदर्भात भारत सरकारने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
11 अधिकाऱ्यांच्या बदल्या
मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 11 राज्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा या महिन्याच्या सुऊवातीला येथे 4 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान राज्याचे डीजीपी पी डोंगल यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी राजीव सिंग यांची वर्णी लावण्यात आली आहे. शनिवारी बदली करण्यात आलेले बहुतांश अधिकारी हिंसाचारग्रस्त भागातील आहेत.