ऑनलाईन टीम / तरुण भारत :
फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. शनिवारी दिल्ली येथे झालेल्या एसीसीआयच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, त्याला आज मंजूरी देण्यात आली. शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते अशा अन्य 20 आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती मिळाली आहे.
काय आहे फोन टॅपिंग प्रकरण?
रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याचा आरोप होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळय़ाचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आ. आशिष देशमुख यांचे फोन रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने हे फोन टॅप केल्याचा आरोप होता.
या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या शुक्ला यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली होती.
अधिक वाचा : शिवसेनेचे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार; राणेंची भविष्यवाणी