प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी वंटमुरी आणि श्रीनगर परिसरात कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र वंटमुरी कॉलनी सातवा क्रॉस येथील समस्यांकडे कानाडोळा करण्यात आला असल्याने डुकरांचा उपद्रव वाढला आहे. तसेच रस्त्याशेजारील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण निधीचे आकडे पाहता स्मार्ट सिटीकरिता खर्ची घालण्यात आलेले अनुदान वाया गेले असल्याची टीका नागरिक करीत आहेत. ठिकठिकाणी विविध वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. पण सदर वाहिन्या व्यवस्थित घालण्यात आल्या नसल्याने नागरिकांना अडचणींचे ठरत आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून दुतर्फा पेव्हर्स घालण्यात आले आहेत. पण वंटमुरी कॉलनी सातवा क्रॉस येथे रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर्स घालण्यात आले नसल्याने गवत वाढून दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने साचून राहत आहे. अशातच डुकरांची संख्या वाढली असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रस्त्याशेजारी घाणीत ठाण मांडून राहणाऱया डुकरांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेने भटकी जनावरे प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. पण पथकातील कर्मचाऱयांचे मोबाईल क्रमांक किंवा संपर्क क्रमांक देण्यात आला नाही. महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदविली असता कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे डुकरांची संख्या वाढली असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांनी लक्ष देवून आवश्यक उपाय-योजना राबवाव्यात, अशा प्रतिक्रिया रहिवासी व्यक्त करीत आहेत.
डेंग्यू-सर्दी तापाच्या रुग्ण संख्येत वाढ
रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांच्या आडवे येत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच डासांचा उपद्रव देखील होत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरात विविध आजारांनी डोकेवर काढले असून सध्या डेंग्यू आणि सर्दी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वंटमुरी कॉलनीतील डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच रस्त्याशेजारील स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.