वेंगुर्ले / प्रतिनिधी
मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर
वेंगुर्ले शहरात निशान तलाव धरणाची अडीज मीटर पातळी वाढूनही तलावात पाणीसाठा नाही तसेच शहरात विहिरी व पाणी टाक्या बांधूनही उन्हाळी पाणी टंचाई कशी काय निर्माण झाली आहे. शहरात नळपाणी योजनेचे पाणी उंचभाग असलेल्या भटवाडी, गाडीअड्डा, दाभोलीनाका, गावडेवाडी, दाभोसवाडा व सुंदरभाटलें या भागात मिळत नाही. त्यामुळे नागरीकांचे पाण्यापासून हाल होत आहेत. जे पाणी नळपाणी योजनेसाठी किती वाजता सोडण्यात येते. त्याची खात्री करा कारण सकाळी नळांना पाणीच नसते. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही प्रत्यक्ष पाणीटंचाईच्या भागात जाऊन माहिती घ्या. आणि सर्वांना पाणी पुरवठा होईल याचे नियोजन करा. अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी केली आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे एक लेखी निवेदन सादर करून त्यात खालील मुद्दयांची माहिती लेखी स्वरूपात व तोंडी माहिती तात्काळ मिळणेबाबतची मागणी केली आहे. यात वेंगुर्ला शहरामध्ये पाणी टंचाईचे संकट का आले ? निशाण तलावासाठी टप्पा क्र. २ उंची वाढविणे हे काम होत पाण्याची पातळी का खाली गेली ? पाणी साठा मुबलक नसताना मुख्यमंत्री यांना अंधारात ठेवून उदघाटन का करण्यात आले. भटवाडी येथील पुरक नळपाणी योजना केली गेली. सुमारे ७० लाख रू. खर्च करून पाणी टंचाईचे संकट का ? गाडी अड्डा येथील पाण्याची टाकी तांबळेश्वर स्मशानभूमी येथील विहीरीचे काय झाले ? अग्निशामक केंद्र कॅम्प येथे पाण्याची टाकी व विहीर मारली हयाचे काय झाले ? पाणीसाठा किती आहे ? हे सर्व असताना पाणी टंचाई का भासली ? हे सर्व असताना बायोमेट्रीक मिटर सिस्टीम का करण्याचा घाट घातला ? शहरातील रस्ते दुरूस्त का गेले नाही ? वेंगुर्ले शहरातील रस्ते गटार व इतर कामांचे बॅनरबाजी होते, तो निधी जिल्हा नियोजनमधून मंजुर होतो. त्या नियोजनामध्ये विरोधी पक्षातील सदस्य आहेत. त्यामुळे बॅनरबाजीचे काम सत्ताधारी करत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना जिल्हानियोजन मार्फत नगरपालिकांना निधी मिळत होता. त्यामुळे सरकार कुठलेही असो निधी देण्याचे काम हे कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी तो निधी द्यावाच लागतो. म्हणून गटार व रस्त्यासाठी बॅनरबाजी करू नये, याबाबतचे लेखी निवेदन उध्दव ठाकरे शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सादर केले.