वन्यप्रदेश-वन्यप्राणी आपले दागिने : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे प्रत्येकाचे कर्तव्यच
बेळगाव : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास वाढला आहे. तो थांबविण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. म्हणून आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने निदान एक तरी रोप लावणे काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे उपक्रम राबवून जनसामान्यात जागृती केली जात आहे. याला प्रतिसाद देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. वनक्षेत्रात वाढ व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा या दृष्टीने वनखात्यामार्फत 1,824.34 हेक्टर क्षेत्रात तब्बल 9 लाख 45 हजार 600 रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 5 लाख रोपांची अधिक लागवड होणार आहे. त्यामुळे साहजिकच वनक्षेत्राच्या वाढीत भर पडणार आहे.
लागवड केलेल्या रोपांची वाढ उत्तम
पर्यटन, विकास, काँक्रिटीकरण, जंगलतोड, वन्यजीव संघर्ष अशा आव्हानांना तोंड देत वनखाते वृक्ष लागवड करत आहे. दरवर्षी लाखो रोपांची लागवड करून वनक्षेत्र वाढीसाठी प्रयत्नशील आहे. गतवर्षी 6 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, यंदा यात मोठी वाढ झाली आहे. बेळगाव विभागातील बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल आणि गोकाक येथील वनक्षेत्रात ही लागवड केली जाणार आहे. पावसाला सुरुवात होताच येत्या 15 दिवसात लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये चंदन, बांबू, सागवान, काजू, पेरू, दालचिनी, कडीपत्ता, सिसम, जांभूळ, लिंबू आदी रोपांचा समावेश असणार आहे. मागील चार वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड झालेल्या रोपांची चांगली वाढ झाली आहे.
पावसाळ्यात रोप लागवडीला प्राधान्य
यंदाच्या पावसाळी हंगामात 9 लाख 45 हजार 600 रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. यापैकी 3 लाख 14 हजार 700 रोपे वितरित झाली आहेत. विशेषत: वन्यप्रदेश, रस्त्यांचा दुतर्फा, खुल्या जागा, सरकारी जागा आणि इतर ठिकाणी या रोपांची लागवड होणार आहे. विशेषत: नैसर्गिक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोप लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात रोपलागवड केली जाणार आहे. हत्ती, बिबटे, वाघ, अस्वल, हरिण, चितळ, सांबर, गवे आदी प्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, त्यांना वन्यप्रदेश कमी पडू नये यासाठी वन्यप्रदेशात अधिक रोपलागवड होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रोपांचे वितरण केले जाणार आहे. वन्यप्रदेश आणि वन्यप्राणी हे आपले दागिने आहेत. त्यांचे संवर्धन होण्यासाठी वन्यप्रदेशात रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा रोप लागवडीचे उद्दिष्ट अधिक आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर विविध ठिकाणी रोपलागवड केली जाणार आहे. मात्र, संवर्धनासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्यही तितकेच आवश्यक आहे.
नर्सरीत रोपे उपलब्ध
बेळगाव विभागातील मच्छे, हलभावी, होसकट्टी, राणी चन्नम्मानगर, शिरूर आदी ठिकाणी असलेल्या वनखात्याच्या नर्सरींमध्ये विविध जातींची रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. रोपांच्या आकारानुसार किमती ठरविण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा उतारा आणि बँक पासबुकची पूर्तता करून रोपे घ्यावीत, असे आवाहन खात्याने केले आहे.
– जी. पी. हर्षाबानू (उपवनसंरक्षण अधिकारी)