भिंतींना तडे, खिडक्या व दरवाजेही मोडकळीस, प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी आणि नागरिकांना अशा अवस्थेतच काम करावे लागत आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या इमारतीची दुर्दशा झाल्याने प्रथमत: इमारतीवरच उपचार करण्याची वेळ आली आहे.
इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या असून खिडक्या आणि दरवाजे तुटले आहेत. शिवाय पावसाळ्यात पाणी गळती होऊन येथे येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: महिला आणि इतर शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची संख्या अधिक असते. मात्र, इमारतीची दुर्दशा झाल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. साधारण शंभर वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. या इमारतीतच मूकबधीर मुलांसाठी शाळा भरविली जात होती. मात्र, शाळा दुसरीकडे स्थलांतरित झाल्यानंतर 1980 पासून महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय या ठिकाणी कार्यरत झाले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या इमारतीचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुर्दशा झालेल्या इमारतीतच काम करावे लागत आहे.
इमारत वापरासाठी योग्य नाही
महिला व बालकल्याण खात्याची इमारत वापरण्यास योग्य नाही. मात्र, या कार्यालयात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सक्षमीकरण विभाग, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी कार्यालय, बाल न्यायाधीकरण, शासकीय निरीक्षणालय, दिव्यांग माहिती, सल्ला आणि हेल्पलाईन केंद्र आदी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, ही सर्व कार्यालये असलेली ही इमारत वापरासाठी योग्य नसल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ही इमारत योग्य नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषत: पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. शिवाय स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.
चार कोटींचा निधी मंजूर
ए. एम. बसवराजू (सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते)
नवीन इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी 50 लाखांचा निधी मंजूर झाला होता. शिवाय नवीन इमारत बांधकामासाठी जुन्या इमारतीच्या शेजारी खुली जागा आहे. येत्या काही दिवसात नवीन इमारत बांधकामाला सुरुवात होईल.