संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे उद्गार ः नेहरूंवर टीका करू शकत नाही
वृत्तसंस्था/ जम्मू
कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याचा पराक्रम तसेच हौतात्म्याचे स्मरण करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पोहोचलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1962 मध्ये चीनसोबतच्या युद्धाचा उल्लेख केला आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यावर अनेक लोक टीका करतात. मी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा सदस्य आहे, परंतु भारताच्या कुठल्याही पंतप्रधानांवर टीका करू इच्छित नाही. तसेच मी कुठल्याही पंतप्रधानांच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू इच्छित नाही. भारत आता संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होतोय. आता भारताचे म्हणणे जग गांभीर्याने ऐकून घेत असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.
कुणाच्याही धोरणांवरून आम्ही टीका करू शकतो, परंतु एखाद्याच्या वृत्तीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. 1692 मध्ये आम्हा लोकांना ज्या त्रुटींमुळे फटका बसला त्या लोकांना माहिती आहेत. त्या नुकसानाची भरपाई आजवर होऊ शकलेली नाही. भारत आता ज्या वेगाने वाटचाल करतोय ते पाहता भारत आता दुर्बल देश ठरलेला नाही हे जबाबदारीपूर्वक सांगू शकतो. भारत आता जगातील सामर्थ्यशाली देश होण्याच्या मार्गावर असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर भारताच्या संसदेत प्रस्ताव संमत झाला होता. पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा होता, भारताचा हिस्सा आहे आणि राहणार आहे. शिवाचे स्वरुप बाबा अमरनाथ आमच्या इथे आणि माता शारदा शक्ती स्वरुप प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे असे कसे असू शकते? आम्ही देशाच्या सेवेत स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱयांचे स्मरण करत आहोत. आमच्या सैन्याने नेहमीच देशासाठी हे सर्वोच्च बलिदान केले आहे. 1999 च्या युद्धात आमच्या अनेक शूर जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. कारगिल विजय हा भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाचा गौरवपूर्ण अध्याय असल्याचे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत.
देशाची एकता, सार्वभौमत्व कायम राखण्यात सैन्याचे मोठे योगदान असल्याचे राजनाथ यांनी म्हटले. तसेच त्यांनी स्वतःच्या भाषणात ब्रिगेडियर उस्मान यांचा उल्लेख केला. संरक्षणमंत्र्यांनी जम्मूच्या झंगड येथे भारताचा ध्वज फडकविण्याच्या नदृढतेचे यावेळी उदाहरण दिले.
स्वातंत्र्यानंतर पासूनच जम्मू-काश्मीर तसेच लडाखचा हा पूर्ण भाग ‘मेन वॉर थिएटर’ ठरलेला आहे. स्वातंत्र्यापासूनच या पूर्ण भागावर शत्रूची वक्रदृष्टी आहे. परंतु भारतीय सैन्याने स्वतःचा पराक्रम आणि बलिदानाद्वारे शत्रूचे कट हाणून पाडले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताला 5 युद्ध लढावे लागले असून यात 1948, 1962 मध्ये चीनविरोधी युद्ध त्यानंतर 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानसोबतचे युद्ध आणि सर्वात अखेरीस 1999 मध्ये झलोले कारगिल युद्ध सामील असल्याचे राजनाथ म्हणाले.