मतांमध्ये गुप्तता राहत नसल्याने सूचना : मतदानानंतर टपाल मतदारावर सूड उगविण्याचे उदाहरण
प्रतिनिधी /पणजी
पंचायत निवडणुकीसाठी काम करणाऱया सरकारी कर्मचाऱयांच्या टपालाने होणाऱया मतदानाची गुप्तता राहत नसल्याचे काहींचे म्हणणे असून ती मते इतर मतांमध्ये एकत्र करुन मोजण्यात यावीत, अशी सूचना त्यांच्याकडून पुढे आली आहे.
निवडणुकीत काम करणाऱया काही सरकारी कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वॉर्डात दोन ते चार अशा मर्यादित स्वरुपात टपाल मते (पोस्टल बॅलेट) असतात. ती मते कोणाची (मतदार) असतात हे उमेदवारांना – त्यांच्या एजंटाना माहीत होते. ती टपाल मते कोणत्या उमेदवारास मिळाली ते मतमोजणीच्यावेळी उघड करण्यात येते. त्यामुळे टपालाने कोणत्या उमेदवारास मतदाराने मतदान केले ते दिसून येते म्हणून त्या मतदानाची गुप्तता राहत नाही, असे मत काहीजणांनी प्रकट केले आहे.
काहीवेळा मतदारांची मते दोन उमेदवारांना समान मिळाली तर मग टपाल मते मोजण्यात येतात. या टपाल मतांमुळे एखादा उमेदवार पराभूत झाला किंवा एखादा उमेदवार जिंकला आणि जिंकलेल्या उमेदवारास एखाद दुसरे टपाल मत मिळाले नाही तर तो उमेदवार पंच-सरपंच झाल्यानंतर संबंधित मतदारावर राग धरुन राहतो. त्या मतदाराची पंचायतीमधील कामे करण्यास उशीर किंवा टाळाटाळ करतो अशी उदाहरणे घडलेली आहेत. पराभूत उमेदवार टपाल मत न दिलेल्या मतदारावर पुढे – मागे निवडून आला तर राग धरुन राहत असल्याचे समोर आले आहे.
टपालाची मते उघड होतात आणि ती मते कोणत्या उमेदवारास मिळाली ते कळते म्हणून वरील प्रकार घडतात. टपालाची मते कोणत्या उमेदवारास मिळाली ते जाहीर करण्यात येऊ नये आणि ती इतर मतदारांच्या मतपत्रिकेत एकत्र करावीत व नंतरच मोजावित असे काहीजणांनी सूचित केले आहे. टपालाच्या मतांची गुप्तता राहत नसल्याने अनेकजण मतदानच करीत नाहीत, असेही आढळून येते. राज्य निवडणूक आयोगाने या टपाल मतांची दखल घेऊन ती उघड होऊ नयेत, त्यांची गुप्तता रहावी म्हणून उपाय करण्याची मागणी होत आहे.