सृजन करणारा परमेश्वर रोज नव्या आकाराचे, रूपाचे, पंचमहाभूतांचे जीव जन्माला घालतो आणि त्याला त्याचा स्वतःचा असा आवाजही देतो. ध्वनी निर्माण करण्याची शक्ती प्रत्येक जिवाला प्रदान करणारा भगवंत हा बहुरूपी आहे. जन्मताक्षणी माणसाचे बाळ टय़ाँहा टय़ाँहा करीत स्वतःची ओळख करून देते. त्यानंतर वेगवेगळे स्वर निर्माण करीत रडणे ही त्याची भाषा असते. आईसाठी, भुकेसाठी, दुखलेखुपले, वेदना, हट्ट सारे व्यक्त होते ते रडण्यातून. हळूहळू शब्दांशी गट्टी जमते आणि ते बाळ शब्दांशी खेळत भाषा बोलू लागते. सुरुवातीला त्याची बोबडी भाषा गोड वाटते. परंतु मोठे होताना जर ती कायम राहिली तर मात्र काळजी वाटते. भाषा ही माणसाचे व्यक्तिमत्व दर्शवते. त्यात मोठा सहभाग हा जिभेचा असतो. दोन अंगुली जीभ परमेश्वराने देह घडवताना मातेच्या उदरातच निर्माण केली. दातांसारखा अवयव जन्मानंतर दिला. मृत्यूपूर्वी दात पडून गेले तरी फारसे माणसाचे बिघडत नाही; मात्र जिभेची साथ त्याला शेवटच्या क्षणापर्यंत हवी असते. बोलणे आणि खाणे देहाच्या अंतापर्यंत सुटत नाही. देहव्यापाराचे सर्व व्यवहार सांभाळणाऱया जिभेला परमेश्वराने बत्तीस दातांच्या कडेकोट बंदोबस्तात लपवून ठेवले आणि वर तोंडाला कुलूप लावण्याची सोय देखील करून ठेवली.
माणसाच्या अवघ्या जीवनप्रवासाचे सूत्र जिभेपाशी आहे. ‘जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र’ असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे. देहरूपाने अस्तित्व संपल्यानंतरही माणूस स्मरणात राहतो तो जिभेमुळे. अंतःकरणातले सारे भाव व्यक्त करते ती जीभच. शांत, तापट, कडू, गोड, मधुर, प्रेमळ, उपहास, टिंगल यावरून स्वभाव ठरतो आणि मरणानंतर दीर्घकाळ माणसांच्या लक्षात राहतो. त्याला कोणते पदार्थ आवडत होते हेसुद्धा स्मरणात असते. त्यामुळे जिवलग आठवण म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रिय असणाऱया पदार्थांचा त्याग करतात. ‘रुचीश्राद्ध’ नावाचे श्राद्ध करता येते. दिवंगत व्यक्तीला जो पदार्थ आवडत होता तो त्याचे मरणसमयी वय जितके होते तितक्मया संख्येने करून दान करावा. गरमगरम, गोड, तिखट, आंबट, खारट आवडीनुसार जन्मभर खाणे ही जिभेची सवय काही तुटत नाही. माणूस जेव्हा या सवयीच्या आहारी जातो तेव्हा आरोग्य बिघडते आणि वृद्धपणी त्याचा इतरांना त्रास होतो. मनुष्य जन्माचे फलित म्हणजे काशीयात्रा अशी धारणा पक्की आहे. काशीला वडाच्या झाडाचे दर्शन घेऊन आवडता पदार्थ जन्मभरासाठी सोडायचा असतो, असे पूर्वज सांगत आले. एकदा एका भक्ताने त्याचे अत्यंत आवडते फळ आंबा हे काशीला जाऊन आल्यावर सोडून दिले. मात्र आंबापोळी, आंबावडी, आम्रखंड असे पदार्थ तो आवडीने खाताना बघून इतरांनी आश्चर्य व्यक्त करताच तो म्हणाला, ‘आंबा हे फळ सोडले. त्यापासून निर्माण होणारे पदार्थ नाही सोडले.’ जीव असा युक्तिवाद करण्यात पटाईत असतो. म्हणून प. प. वासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, ‘सत्वर गती जया असे। जो जळी धावतसे। धरता हाता न येतसे। तो बद्ध होतसे जिव्हेमुळे।’ जळात मुबलक अन्न मिळत असूनही मासा माणसाने टाकलेल्या गळाला लागतो कारण जीभ. म्हणून श्री दत्तप्रभूंनी माशाला गुरू केले. रसनेचा अभ्यास करावा लागतो. प. प. टेंबे स्वामी पुढे म्हणतात, ‘थोडा थोडा रस कमी करा। प्राणवृत्ती परी आचरा। जिंकाल मग रसना ती।’ जीभ जिंकली म्हणजे सर्व जिंकल्यासारखेच आहे.
बोलण्यात देखील जिभेला जिंकता यावे म्हणून अभ्यास करावा लागतो. सर्व संतांनी यावर प्रबोधन केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘निंदक तो पर उपकारी’. निंदा करणारा माणूस कपडे धुणाऱयांपेक्षा मोठे काम करत असतो. संत तुकाराम महाराज निंदकाच्या मुखाला सवंदणी (टब) म्हणतात. जीभ काय करते? ‘जिव्हा साबण निरुते’। साबणाचे काम करून दोष काढी जन्माचे. दुसऱयांची पापे फुकट धुवून देते. ज्याची निंदा जिभेकडून होते त्याची कर्मधुलाई होते. संत कबीर साहेबांचा दोहा असाच आहे. ते म्हणतात, ‘निंदक नियरे रखिए, आँगन कुटी छवाय, बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय’. निंदकाला नेहमी आपल्या आसपास ठेवा. एवढेच कशाला, त्याला आपल्या अंगणात कुटी बांधून वृक्षांच्या छायेतच ठेवा. त्याने तुमचे दोष काढले की आपोआपच माणसाला आपल्या स्वभावाची ओळख होते आणि पाणी व साबणाशिवाय स्वभाव निर्मळ होतो. बोलण्याची उर्मी माणसाला आवरत नाही म्हणून तिला नामस्मरणाचे वळण लावावे असे संतसज्जन कळकळून सांगतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, ‘मी माझी जीभ नामाला विकली’. संत गाडगेबाबा म्हणत, ‘जिभले तुले काय धंदा, क्षणभर भजावे गोविंदा.’ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुष्ट माणसाचे तोंड म्हणजे जणू नागिणीचे बिळ असते. जीभ नावाची नागीण एकाच्या कानाला चावते आणि दुसऱयाचा मृत्यू करवते. म्हणून तिला भजनाचे वळण लावावे. जात्यावर बसून ओव्या गाणाऱया स्त्रियांनी ‘जिव्हेबाई’ असे संबोधन वापरून तिला उपदेश केला आहे.
‘राम राम म्हणून जपती माझे ओठ
जिव्हेबाई घ्यावा घोट अमृताचा’
राम राम म्हणून जपती माझ्या दाढा
घेई अमृताचा काढा जिव्हेबाई।’
परमार्थाच्या वाटेवर चालताना जीभ फारच महत्त्वाची आहे. साधकाने खाण्याची वासना जिंकली की त्याला अन्नमय कोषातून सहज बाहेर पडता येते. माणसाचे आयुष्य सरताना तो अन्नमय कोषाच्या पलीकडे जाऊ न शकल्याने पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. पंचकोशाच्या आवरणातून बाहेर पडल्यावर ‘कुटस्थ’ परमात्म्याचे दर्शन घडते. जीभ ही जणू मोक्षाकडे जाण्याची शिडी आहे. सापशिडीतील खेळासारखी. एक एक घर वर चढताना मध्येच एखादा वासनेचा सर्प आडवा आला तर गच्छंती ठरली आहे. जीभ नरकाची द्वारेही सहज उघडून देते. आयुष्याच्या उत्तरार्धात जीभ फार बडबड करते आणि खाण्याची मागणी करते. खाण्याची इच्छा मनात राहून गेली तर जीव मुक्त होत नाही. त्याची सुटका करावी लागते.
अबोला कोणालाही आवडत नाही. अबोल माणसांजवळ माणसांचा पसारा नसतो. अबोल माणूस मनस्वी व शांत असेल तर त्याचे जीवन बहरते, यात मात्र शंका नाही. कारण बोलण्यात ऊर्जा खर्च होते. मुकेपण तितकेसे बरे नसते. त्यात बोलणे नसले तरी आतमध्ये आक्रोश असू शकतो. जगण्यातली उत्तरे न सापडल्यामुळे किंवा अतीव दुःखामुळे मुकेपण अपरिहार्यतेने वाटेला येते. आकांत कधीकधी बाहेरच पडत नाही. मौन हे आनंद देते. सागराच्या तळाशी जशी शांतता अन अथांगपण असते तशी मौन धारण करणारे महात्मे असतात. मनाचा लय झाल्यामुळे इंद्रियांचे काम संपले असते. अशावेळी ते सोहम जपात विरघळलेले असतात. ‘दात होठ हाले नही, जिव्हा करे न काम। राम हमारा काम करे हम बैठे आराम।’ अशा आनंदात मग्न असणाऱया सत्पुरुषांना मौनाने नमस्कार करावा आणि जिभेला तोंडाच्या कुलपात बंद ठेवावे. साधनेच्या वाटेवर आपोआप पावले पडत जातात हे निश्चित.
– स्नेहा शिनखेडे