मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंगळूर जिल्हा भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारु यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागल्याने सरकारने याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात येणार आहे.
बेंगळूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. प्रवीण नेट्टारु यांची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. याविषयी आपण माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास केला जात आहे. दोन राज्यांशी संबंधित हे प्रकरण असल्याने तपास एनआयएकडे सोपविण्यात येणार आहे. त्याकरिता एनआयएच्या मुख्यालयात पत्र पाठविण्याची सूचना अधिकाऱयांना दिली आहे. तसेच केरळ सीमेवर चेकपोस्ट निर्माण करून वाहनांची तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. मंगळूर जिल्हय़ातील संवेदनशील भागात पोलिसांची छावणी उभारण्याची आणि या भागात केएसआरपीची तुकडी तैनात करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही
राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडलेली नाही. मंगळूर जिल्हय़ातील हत्या प्रकरणी कठोर कारवाई केली जात आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही. गुरुवारी आपण मंगळूरहून परत येत असताना आणखी एक खून झाला आहे. याविषयी देखील संपूर्ण माहिती घेतली आहे. प्रवीण नेट्टारु यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी फाजीलची हत्या झाली आहे का, याबाबत माहिती नाही. पोलीस याविषयी तपास करीत आहेत, असे ते म्हणाले.
कठोर नियम जारी करण्याचा विचार
बेंगळुरात पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली आहे. किनारपट्टी भागात कठोर नियम जारी करण्याचा विचार सुरू आहे. केरळमधून कर्नाटकात येण्यासाठी 50 रस्ते आहेत. रस्त्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली असून तपासणी केली जात आहे. आवश्यकता भासली तर उत्तरप्रदेश किंवा कर्नाटकच्या धर्तीवर कारवाई केली जाईल. मात्र, तपास आणि कारवाईमध्ये कोणतीही उणीव सोडली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
निर्णयाचे प्रवीण यांच्या कुटुंबीयांकडून स्वागत
युवा भाजप नेते प्रवीण नेट्टारु यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे प्रवीण यांच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगळूर जिल्हय़ात दुकाने सायंकाळी 6 पर्यंत सुरू
मंगळूर जिल्हय़ात मागील दोन आठवडय़ात तिघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ात तणावपूर्ण वातावरण असून खबरदारी म्हणून जिल्हय़ात 1 ऑगस्टपर्यंत सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतील, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी दिला आहे. जनतेने शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरत्कल येथे गुरुवारी रात्री फाजील नामक युवकाची हत्या झाली होती. त्यामुळे मंगळूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मंगळूर कमिशनरेट हद्दीत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
हत्येतील आरोपींचा एन्काऊंटर करण्यास सरकार सज्ज
निष्पाप व्यक्तींच्या हत्या सहन करणार नाही. हत्या करणाऱया आरोपींवर एन्काऊंटरसह कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास राज्य सरकार तयार आहे, असा इशारा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिला आहे. अशा प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होणे साहजिकच आहे. सरकार आणि गृहमंत्री समर्थपणे काम करीत आहेत. जनतेच्या भावनांचा सरकार विचार करीत आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कामकाज चाललेले नाही. त्यापेक्षा पाच पावले पुढे जाऊन कारवाई केली जात आहे. सरकारवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे हत्या करणाऱयांचा एन्काऊंटर करण्यास सरकार तयार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.