पंचगंगेच्या तळातून जलवाहिनी टाकण्याचे काम रखडणार : नदीपात्रात पाणी आल्याने पाच दिवसापासून काम बंद : पाणी कमी होण्याची प्रतिक्षा
प्रतिनिधी/ इचलकरंजी
कुरुंदवाड नजीक पंचगंगा नदीच्या तळातून कृष्णा योजनेची जलवाहिनी टाकण्याच्या कामास अवकाळी पावसामुळे खीळ बसली आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात पाणीपातळी वाढल्याने पाच दिवसांपासून काम बंद आहे. त्यामुळे आता पाणीपातळी कमी होण्याची तसेच तेथे यंत्रसामग्री नेण्यासाठी रस्ता मिळण्याच्या प्रतिक्षेत इचलकरंजी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया कृष्णा योजनेची जलवाहिनी सडल्याने ती बदलण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामध्ये कुरुंदवाड लगत असलेल्या पंचगंगा नदीपात्रातून कॉलमवर टाकण्यात आलेली जलवाहिनी बदलून त्या ठिकाणी पंचगंगा नदीच्या तळातून जलवाहिनी बसवण्याच्या कामाचा समावेश आहे. सुमारे 120 मीटर पैकी 80 मीटर लांबीची जलवाहिनी पंचगंगेच्या तळामध्ये सुमारे आठ ते दहा फुट खोलीची चर काढून तेथे काँक्रिटीकरण करून चांगल्या दर्जाची जलवाहिनी बसवण्यात येत आहे. यासाठी माजी सभापती विठ्ठल चोपडे, जलअभियंता सुभाष देशपांडे, बाजी कांबळे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत.
सध्या जलवाहिनी बसवण्याचे काम सुमारे 75 टक्के इतके पूर्ण झाले आहे. नुकतेच पुणे जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता रहाणे यांनी भेट देवून कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यामुळे लवकरच हे काम पुर्ण होईल अशी आशा असतानाच शुक्रवार 20 रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या कामास बसला आहे. त्या दिवशी झालेल्या तुफान पावसामुळे नदीची पाणीपातळी झपाटय़ाने वाढली आहे. त्यामुळे नदीपात्रात टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीची जागी पुर्णपणे पाणी आले आहे. यामुळे पाच दिवसांपासून काम बंद आहे. त्यातच नदीकडे जाणाऱया वाटेवरही पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने तेथे कामासाठी अवजड यंत्रसामग्री नेणेही जिकीरीचे बनले आहे.
वास्तविक पाहता हे काम शहराला पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीकोणातुन युद्धपातळीवर कार्यवाही सुरु होती. पण अचानक आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा हे काम लांबणीवर पडले आहे. पण दोन दिवसात पाणीपातळी कमी झाल्यानंतर काम पुर्ववत सुरु होईल अशी अपेक्षा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
केवळ 25 मीटर जलवाहिनी बदलणे बाकी
पंचगंगेच्या तळातून टाकण्यात येणाऱया 80 मीटर जलवाहिनीपैकी केवळ 25 मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक उरले आहे. येणारा पावसाळा तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग लक्षात घेवून काम मे महिन्याअखेर पुर्ण करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले होते. यामुळे मोठया प्रमाणात पाण्याची गळती थांबणार होतीच पण 11 किमीची जलवाहिनी लिकेजप्रुफ होणार असल्याने 8 ते 10 एमएलडी पाणी शहरास जादा उपलब्ध होणार आहे. पण याला तात्पुरता बेक लागला आहे.