मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदाराचे आवाहन ः कारवाई होणार
भोपाळ / वृत्तसंस्था
भारताच्या राज्यघटनेला वाचवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे या हत्येची तयारी करावी, असे खळबळजनक आणि प्रक्षोभक आवाहन मध्यप्रदेशातील काँगेस आमदार राजा पटेरिया यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पटेरिया यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहेत. ते निवडणुका संपवतील. ते धर्म, जात आणि भाषेच्या आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करत आहेत. त्यांच्या राज्यात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्य लोकांना धोका निर्माण झाला आहे. तुम्हाला जर या देशाची राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्यात आली पाहिजे. त्यांची हत्या करण्यासाठी तयार रहा, अशा अर्थाचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.
तक्रार सादर
त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यावर भाजपने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काँगेसवर शरसंधान करताना, या विधानामुळे काँगेसचा खरा चेहरा उघड झाला असे प्रतिपादन केले. पटेरिया यांच्या विरोधात कठोर कारवाई राज्य सरकार करेलच. याशिवाय जनताही काँगेसला तिची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ‘भारत जोडो’ यात्रेचा बनाव रचणाऱयांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
कारवाईचे आदेश
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी पटेरिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले असून काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने असे विधान करावे हे खेदजनक असल्याचे प्रतिपादन केले. भाजपच्या मध्यप्रदेश शाखेचे अध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनीही काँगेसला धारेवर धरले. पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट राहुल गांधींच्या ‘भारत तोडो’ यात्रेत रचण्यात आला आहे का, याची चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही शर्मा यांनी राज्य सरकारकडे केली.
पटेरिया यांची सारवासारवी
आपल्या विधानासंबंधी सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, हे लक्षात आल्यानंतर पटेरिया यांनी सारवासारवीची भाषा सुरू केली आहे. आपल्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. तसेच ती चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येत आहेत. मी गांधींचा अनुयायी आहे. कोणाच्याही हत्येची भाषा मी करू शकत नाही. राज्य घटना, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक यांना वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदींना पराभूत करा असे मला म्हणावयाचे होते, असा खुलासा करण्याचा प्रयत्न त्यांनी एका व्हिडीओद्वारे केला. मात्र, त्यांनी केलेल्या विधानासंबंधी क्षमा याचना केलेली नाही, तसेच खेदही व्यक्त केलेला नाही.