ऑनलाईन टीम/तरुण भारत
मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या राणा दाम्पत्याने माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. खुद्द रवी राणा यांनी माघार घेत असल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्याने ही माहिती दिली. आमदार रवी राणा (ravee rana) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला कोणताही गालबोट लागू नये म्हणून आम्ही माघार घेत आहोत, कुणाच्या दबावाखाली येऊन नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी उद्या मुंबईत येणार आहेत. यासाठी राणा दाम्पत्याने आपले आंदोलन माघार घेतले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही चुकीचे वक्तव्य केले नाही. हनुमान चालिसेसाठी आमचा आग्रह होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. आम्ही भक्तिभावाने मातोश्रीवर जाणार होतो. मात्र त्यांनी येऊ दिले नाही. शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून दिले ते केवळ मोदींच्या भरवशावर आले आहेत.
राणा दाम्पत्याच्या माघारीनंतर वरून सरदेसाई (varun sardesai) यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची कुणाची हिंमत नाही हे अधोरेखित झाले आहे. उद्या पंतप्रधानाचा दौरा व्यवस्थित होणार. मात्र हे केवळ कारण आहे, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे. अमरावतीवरून मातोश्रीवर येणार होते. मात्र त्यांना येता आले नाही. शिवसेनेचा नाद करू नये, हे राणा दाम्पत्याला समजले, अशी टीका वरून सरदेसाई यांनी केली आहे.