ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्तानाटय़ानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला प्रमुख शहरांसह विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. ठाणे, कल्याण-डेंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, ऐरोली आणि नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत असतानाच आता यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांनी आज यासंदर्भात घोषणा केली.
एकनाथ शिंदे गटाचे ठाण्याचे नगरसेवक राजेंद्र पाठक हे शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असून, शिंदे गटाच्या समर्थनासाठी चाचपणी करत होते. कालपर्यंत आमदार संजय राठोड यांचे कार्यकर्ते शिंदे गटाचे समर्थक होते. मात्र, आता खासदार भावना गवळी यांच्या गटातील 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गट भक्कम होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांची लोकसभेच्या प्रतोदपदावरुन उचलबांगडी शिवसेनेने केली होती. त्यांच्याऐवजी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे. मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी यामुळे याबाबत अद्यार लोकसभा सचिवालयाकडून काही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : खरंच ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; संजय राऊत म्हणाले…