22 हजार नवीन लाभार्थी : मात्र रेशनात कपात, लवकरच होणार वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या बीपीएल रेशनकार्ड वितरणाला चालना मिळाली आहे. रेशनकार्ड वितरणास शासनाने हिरवा कंदील दाखविल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दरमहा मिळणाऱ्या रेशनमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना यापुढे केवळ 6 किलो तांदळावरच समाधान मानावे लागणार आहे.
जिल्ह्यात 73 हजार लाभार्थ्यांनी बीपीएलसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 22 हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या कार्डधारकांना लवकरच रेशनकार्ड मिळणार आहे. मागील दोन वर्षांत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत आणि अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला जात होता. मात्र, चालू वर्षात या अतिरिक्त धान्याच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या कार्डधारकांमध्ये आदिवासी, भटक्या विमुक्त जाती आणि अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबीयांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत 2022 मध्ये 10 हजार 874 नवीन बीपीएल शिधापत्रिका वितरणास मंजुरी मिळाली होती. त्यापाठोपाठ आता 22 हजार नवीन कार्डांना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. मात्र, उर्वरित लाभार्थ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासकीय कामांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचे आहे. मात्र, बऱ्याच लाभार्थ्यांकडे रेशनकार्ड नसल्याने शासकीय कामांसाठी अडचणी येत आहेत. शिवाय रेशनपासूनदेखील वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सामान्य लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, रेशनकार्डमध्ये फेरबदल करण्याची प्रक्रियादेखील ऑनलाईन करण्यात आली आहे. नावात बदल, पत्त्यात बदल, नवीन नावांचा समावेश करणे आदी कामे ऑनलाईन पद्धतीनेच केली जात आहेत.
30 हजार 893 अर्ज प्रलंबित
जिल्ह्यात 75 हजार 116 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 22 हजार 765 अर्जांना मंजुरी मिळाली आहे तर 20 हजार 155 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित 30 हजार 893 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच नवीन रेशनकार्ड वितरणाला चालना मिळाली आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरीपुरवठा खाते)