प्रतिनिधी / बेळगाव
पदवीधर शिक्षक भरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. दिवसभरात कन्नड, उर्दू व मराठी माध्यमाच्या पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी झाली. ही प्रक्रिया सोमवार दि. 29 पर्यंत चालणार होती. परंतु, सोमवारी उमेदवार कमी असल्यामुळे शुक्रवारीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दिवसभरात एकूण 83 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार होती. त्यापैकी 13 हजार पात्र उमेदवार निश्चित करण्यात आले. सोमवार दि. 22 पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली. उमेदवारांना विषयानुरुप क्रमांक देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी करून त्यामध्ये त्रुटी आहेत का? हे पाहण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात पात्र उमेदवारांची गर्दी झाली होती. यामध्ये मराठी माध्यमाच्या पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांच्या बीएड् तसेच एमए, बीए यासह इतर पदवी प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यांना विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. अशा विद्यार्थ्यांना बँकेचे चलन भरावे लागणार आहे. शनिवारी बँकांना सुटी असल्यामुळे ही प्रक्रिया आता सोमवारीच पूर्ण करावी लागणार आहे.