अलारवाडमधील मुस्लीम बांधवांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अलारवाड गावामध्ये मोठय़ा संख्येने मुस्लीम बांधव राहत आहेत. मात्र त्यांना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही. त्यामुळे त्यांना समस्या निर्माण झाली आहे. स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, या मागणीसाठी अलारवाड येथील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यापूर्वी अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अलारवाड गाव हे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या गावातील मुस्लिमांना खासगी जागेत स्मशानभूमी उपलब्ध आहे. केवळ 18 गुंठे जागा आहे. आता सदर जागामालक कायमस्वरुपी खरेदी करा, असे सांगत आहेत. तेंव्हा ती जागा खरेदी करावी. याचबरोबर त्याला लागून असलेली आणखी 20 गुंठे जागा देखील खरेदी करून मुस्लीम बांधवांसाठी उपलब्ध करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक गावातील समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करा, असे सांगितले आहे. मात्र तहसीलदार, सर्कल आणि तलाठी कोणत्याच हालचाली करण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र दुर्लक्ष करण्यात आले. 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तेंव्हा ही रक्कम प्रत्येक गावातील स्मशानभूमीसाठी खर्च करावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबू मुल्ला, ए. डी. सनदी, एम. आर. मुल्ला, गौस सनदी, मोहम्मदगौस मुल्ला, मैनुद्दीन मुल्ला, इम्रान सनदी, कुतबुद्दीन मुल्ला, सद्दाम सनदी, पापुल सनदी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.