राजापूर वार्ताहर
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा मंगळवारी महामार्गाचा पाहणी दौरा असताना याचदिवशी सकाळी महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे अपघात होवून राजापूर कुणबी पतपेढीच्या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. सानिका पुजारी व संदीप पुजारी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. हॉटेल गुरूमाऊली समोर हा अपघात घडला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी वाकेडपासून तळगावपर्यंत 5-6 ठिकाणी महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे ही ठिकाणे अपघाताचे कारण ठरत आहेत. हॉटेल गुरूमाऊलीसमोर रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पूर्वी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. त्यानंतर मात्र रस्त्याची दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे दुतर्फा वाहतूक सुरू होती. मात्र आता पुन्हा एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
राजापूर शहरालगतच्या हर्डी येथील रहिवासी संदीप पुजारी हे मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नी व कुणबी पतपेढीच्या कर्मचारी सानिका पुजारी यांना कुणबी पतपेढीच्या ओणी शाखेत सोडण्यासाठी चारचाकीने जात होते. हाॉटेल गुरूमाऊलीसमोर आले असता समोरून वेगात येणारा ट्रक अचानक समोर डायव्हर्जन आल्याने गाडी दुसऱ्या बाजूला घेत असताना उलटला. उलटताना ट्रक पुजारी यांच्या गाडीच्या दिशेने येवू लागल्याने त्यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी लगतच्या कठड्यावर आदळली. याचदरम्यान उलटलेल्या ट्रकचा काही भागही चारचाकीवर कोसळला. यात सानिका पुजारी यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली तर संदीप पुजारी किरकोळ जखमी झाले. दोघांनाही राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सानिका पुजारी यांच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग येथे हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव यांच्यासह कर्मचारी तसेच हर्डीतील ग्रामस्थांनी ग्रामीण रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली.