आवारात चिखल, प्रवाशांची गैरसोय : परिवहनने खड्डे बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सतत गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडून पाण्याची डबकी निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांची कसरत सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात दुर्दशा झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तातडीने बसस्थानकातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
बसस्थानक आवारातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. उन्हाळय़ात धूळ तर पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांसह बसचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच बसस्थानकाला अस्वच्छता, आसनाचा अभाव, रस्त्यांची दुर्दशा आदी समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात फिरणे मुश्किल बनले आहे.
चिखलाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासह आवारात मोठमोठी डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना कसरत करतच बस शोधावी लागत आहे. दरम्यान जवळून बस गेल्यास चिखलाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. शिवाय लहान मुले आणि वयोवृद्धांना या डबक्मयातून ये-जा करावी लागत आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊनदेखील परिवहनचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
महिला प्रवाशांची हेळसांड
शाळांना प्रारंभ झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र बसस्थानकात सोयींपेक्षा गैरसोयींचाच अधिक सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे. बसस्थानक आवारात चिखलाबरोबर गढूळ पाण्याची डबकी निर्माण झाल्याने गैरसोय होत आहे. एकीकडे स्मार्ट बसस्थानकाचा विकास सुरू आहे, तर दुसरीकडे बसस्थानकाच्या आवारात अनेक समस्या निर्माण झाल्याने ये-जा करणे देखील कठीण झाले आहे.