वृत्तसंस्था/ लंडन
अजिंक्य रहाणे 18 महिन्यांनी भारतातर्फे कसोटी खेळण्यास सज्ज झाला असून ओव्हल येथे खेळविल्या जाणार असलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो उतरेल तेव्हा संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ‘करो किंवा मरो’ धर्तीच्या परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागेल.
‘टी20’मधून पाच दिवसांच्या कसोटी सामन्याशी रहाणेला झटपट जुळवून घ्यावे लागणार असून आयपीएलमध्ये मिळालेला सूर आणि दाखविलेला ‘टायमिंग’ लंडनमध्येही कायम राहण्याची तो आशा बाळगून असेल. दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनाही कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय 2022 च्या सुऊवातीला घेण्यात आला होता. परंतु त्याच वर्षी काउंटी क्रिकेटमध्ये भरपूर धावा जमविल्यानंतर पुजाराने संघात पुनरागमन केले.
82 कसोटी सामने खेळलेल्या रहाणेला मात्र त्याच्या पुनरागमनासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. त्याने रणजी चषक स्पर्धेत भरपूर धावा जमविल्यानंतर आणि खास करून अलीकडेच झालेल्या आयपीएलमध्ये सर्वांना प्रभावित केल्यानंतर त्याला पुन्हा कसोटी संघात बोलावणे आलेले आहे. परंतु श्रेयस अय्यर तंदुऊस्त असल्यास त्याला कदाचित संघातील हे स्थान मिळाले नसते. वयाने लहान असलेल्या अय्यरने मधल्या फळीतील स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केलेली आहे, त्यामुळे रहाणेच्या पुनरागमनात फॉर्म आणि नशीब या दोन्हींचा वाटा आहे. तो जेव्हा ओव्हलवर फलंदाजीस उतरेल तेव्हा संघातील स्थानाविषयीच्या अनिश्चिततेची बाब निश्चितच त्याच्या मनात असेल.
रहाणेची दक्षिण लंडनमध्ये खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमधील कामगिरी फारशी खास नाही. पण ही बाब त्याच्या मनावर दडपण आणण्याची शक्यता नाही कारण न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक शतकांची नोंद केलेल्या रहाणेच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या क्षमतेविषयी कधीच प्रश्न उपस्थित झालेला नाही. 2021 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठ्या विजयांपैकी एकाची नोंद केली होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली झालेली आहे. यावेळी त्याच्यावर कर्णधारपदाचे अतिरिक्त दडपणही नसेल, आणि त्याला फक्त त्याची बॅट चालवावी लागेल.
कसोटीतील 38.52 या सरासरीतून रहाणेची सातत्यपूर्ण कामिगरी फारशी कळत नाही. परंतु निवड समितीचा माजी सदस्य एम. एस. के प्रसाद याच्या मतानुसार, या अनुभवी फलंदाजाने जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला भारतीय संघातून पुढे खेळवायला हवे.