विदेशात खोटा प्रचार केल्याचा आरोप ः काँग्रेसकडून प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जात असल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी ब्रिटनमध्ये केला होता. राहुल यांच्या या वक्तव्यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेत माइक बंद केले जात असल्याचे विदेशी भूमीत म्हणणे हा एकप्रकारचा खोटा प्रचार असून हा देशाचा अपमान असल्याचे उपराष्ट्रपतींनी थेट नामोल्लेख टाळून म्हटले आहे.
नवी दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह यांच्या मुंडक उपनिषदावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना धनखड यांनी अशा शक्तींचा खरा चेहरा समोर आणून त्यांचा डाव हाणून पाडा असे आवाहन लोकांना केले आहे. तर धनखड यांच्या टिप्पणींवर प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपराष्ट्रपती हे सरकारचे चियरलीडर असू शकत नसल्याचे म्हटले आहे.
शांत बसलो तर….
भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जग आमच्या ऐतहासिक कामगिरी आणि जिवंत लोकशाहीला स्वीकारत आहे. तर आमच्यापैकी काही जण, ज्यात खासदार देखील सामील आहेत, ते समृद्ध लोकशाहीच्या मूल्यांना धक्का पोहोचवू पाहत आहेत. कुठलाही राजकीय पक्ष लोकशाहीवादी मूल्यांशी तडजोड करण्याच्या प्रकाराला योग्य ठरू शकत नसल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. भारताबाहेरील एखाद्या खासदाराच्या या दुस्साहसावर मी शांत बसून राहिलो तर चुकीचे उदाहरण ठरणार आहे. संसदेत माइक बंद करण्याचा दावा मी योग्य कसा ठरवू शकतो असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.
आणीबाणीची पुनरावृत्ती शक्य नाही
भारताला जी-20 चे अध्यक्षत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. तर काही लोक देशाबाहेर भारतीय संसद आणि त्याच्या घटनात्मक शाखांची प्रतिमा मलीन करत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. आमच्या राजकीय इतिहासात आणीबाणीचा कालखंड हा काळा अध्याय आहे. भारतीय राजकीय व्यवस्था आता परिपक्व झाली असल्याने आणीबाणीची पुनरावृत्ती शक्य नसल्याचे उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.