हैदराबादमध्ये पोहोचली भारत जोडो यात्रा
वृत्तसंस्था / हैदराबाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारसमोर मंगळवारी तिरंगा फडकविला आहे. सुमारे 32 वर्षांपूर्वी त्यांचे पिता आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी चारमिनार येथूनच ‘सद्भावना यात्रा’ सुरू केली होती.
राहुल गांधी यांच्यासोबत चारमिनार येथे काँग्रेस महासचिव जयराम रमेश, वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष रेवंथ रेड्डी देखील उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मंगळवारी हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर पहिल्यांदाच ते यात्रेत सहभागी झाले आहेत.
19 ऑक्टोबर 1990 रोजी राजीव गांधी यांनी चारमिनार येथूनच ‘सद्भावना यात्रे’स सुरुवात केली होती. दरवर्षी या तारखेला काँग्रेसकडून चारमिनार येथे तिरंगा फडकविण्यात येतो. यंदा 19 ऑक्टोबर रोजी हे शक्य न झाल्याने मंगळवारी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
32 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी म्हणजेच राजीव गांधींनी चारमिनार येथून सद्भावना यात्रा सुरू केली होती. भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्वासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली होती. सद्भावना हे मानवतेचे सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे. मी आणि काँग्रेस पक्ष या मूल्याचा ऱहास कुठल्याही विभाजनकारी शक्तीसमोर होऊ देणार नसल्याचे राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे.
भाजप अन् टीआरएस लक्ष्य
भारत जोडो यात्रा ही द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आहे. भाजप-संघ द्वेष पसरविण्याचे काम करतात. भावा-भावांमध्ये भांडणं लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. या यात्रेला कुठलीच शक्ती रोखू शकत नाही. ही यात्रा म्हणजे भारताचा खरा आवाज आहे. तेलंगणातील सत्तारुढ टीआरएस अन् भाजप यांच्यात संगनमत आहे. भाजप अन् टीआरएस हे निवडणुकीपूर्वी विरोधात असल्याचे नाटक करतात. पंतप्रधान मोदींच्या इशाऱयावरच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव काम करत आहेत. केसीआर हे भूखंड लाटत असून सिंचन प्रकल्पातून पैसे हडप करत आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.