लोकसभा गृहनिर्माण समितीने पाठवली नोटीस ; महिन्याची मुदत
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांना सरकारने दिलेला बंगला लवकरच रिकामा करावा लागणार आहे. यासंदर्भात त्यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये राहुल गांधी यांना 12, तुघलक रोड येथील सरकारी बंगला रिकामा करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार त्यांना 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता संसदेतून बाहेर पडल्यानंतर महिनाभरात त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने शासकीय निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे. सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना सरकारी निवासस्थानही गमवावे लागणार आहे.
मोदी आडनावाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना गुऊवारी सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना कलम 504 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. यासोबतच त्यांना तात्काळ जामीनही देण्यात आला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्याविऊद्ध आयपीसी कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.